सर्वोच्च न्यायालयाच्या टास्क फोर्समध्ये महाराष्ट्राचे दोन डॉक्टर

सर्वोच्च न्यायालयाच्या टास्क फोर्समध्ये महाराष्ट्राचे दोन डॉक्टर

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरा पडणारा ऑक्सिजन आणि औषधांचा साठा यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत राज्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेशही दिले. मात्र, फक्त आदेश न देता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून राज्यांना होणारा ऑक्सिजन व औषधांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष 12 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या समितीमध्ये महाराष्ट्रातील दोन डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फोर्टिस रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर मेडिसीन अँड आयसीयूचे संचालक डॉ. राहुल पंडित आणि हिंदुजा रुग्णालयाचे कन्सल्टेंट चेस्ट फिजिशियन डॉ. जरीर एफ उदवाडिया यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे.

कोरोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्येही डॉ. जरीर उदवाडिया आणि डॉ. राहुल पंडित यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली ही समिती राज्य सरकारना होणार्‍या ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्याबाबत केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यास मदत करणार आहे. तसेच ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्याची नियमावली तयार करण्यासही ही समिती स्वतंत्र असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

First Published on: May 9, 2021 4:30 AM
Exit mobile version