कर्नाटकचे नाटक आता थांबवा – उद्धव ठाकरे

कर्नाटकचे नाटक आता थांबवा – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

कर्नाटक येथील राजकीय नाट्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून जोरदार टीका केली असून काहीही करा, पण कर्नाटकातील हे नाटक एकदाचे संपवा असे ते म्हणाले आहेत. कर्नाटकमधील सध्याचा राजकीय तिढा आता एवढा क्लिष्ट झाला आहे की, तो कमी वेळेत सोडविता येईल की नाही, याबद्दल कायदा वर्तुळात शंका व्यक्त होत आहेत. काँग्रेसनेदेखील पुनर्विचार याचिका दाखल करून आणखी एक तंगडे या त्रांगड्यात अडकवले आहे. लोकशाहीचे असे धिंडवडे कर्नाटकात सर्वच जण काढत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सामाना अग्रलेखातून म्हटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ‘सामना’तून

दोन्ही बाजूंचा हा तमाशा केंद्र सरकारदेखील शांतपणे का पाहात आहे? एक तर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा किंवा कर्नाटक विधानसभाच बरखास्त करा. कर्नाटकच्या जनतेलाच उद्या काय तो निर्णय घेऊ द्या. काहीही करा, पण कर्नाटकातील हे नाटक एकदाचे संपवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कर्नाटकात सध्या जो राजकीय तमाशा सुरू आहे तो आज तरी संपेल काय हे सांगणे कठीण आहे. बहुमताचा निर्णय संसदेच्या किंवा विधानसभेच्या सभागृहात व्हायला हवा.

असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. बहुमत गमावून बसलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे विधानसभेत चर्चेत वेळ घालवत आहेत. त्यांनी एकदाचे मतदान घेऊन लोकशाहीची बूज राखायला हवी होती, पण त्यांचा श्वास मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत असा अडकला आहे, अशी टीका देखील यावेळी केली केली. तसेच राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि कुमारस्वामी अशी तीन प्रमुख पात्रे या खेळात आपापले पत्ते फेकत आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यात पाय टाकला आहे तसेच १५ बंडखोर आमदार मात्र चारही बोटे तुपात असल्याप्रमाणे मजा करत आहेत. बंडखोर १५ आमदारांनी विधानसभेत उपस्थित राहणे बंधनकारक नाही आणि त्यांच्यावर व्हीप मोडल्याबद्दल पक्षांतर विरोधी कायद्याखाली बरखास्तीची कारवाई करता येणार नाही, असा आदेश १७ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाचा अर्थ विशद करून सांगा, अशी याचिका कुमारस्वामींनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्यावर आज, सोमवारी सुनावणी होईल. म्हणजे सोमवारपर्यंत कुमारस्वामी यांना जीवदान मिळाले, पण सोमवारनंतर काय? याचे उत्तर कुमारस्वामींकडे नाही. सोमवार नाही तर मंगळवार, कधीतरी कुमारस्वामी यांना विश्वासदर्शक ठरावास सामोरे जावेच लागेल. तेव्हा लोकशाही व संसदीय परंपरेची बूज राखत कुमारस्वामी यांनी सत्तात्याग करायला हवा होता. बहुमत गमावलेले एक मुख्यमंत्री खुर्चीवर चिकटून राहण्यासाठी दयनीय धडपड करत असल्याचे चित्र देश पाहत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

First Published on: July 22, 2019 10:40 AM
Exit mobile version