‘पाणी कसं अस्तं’ कवितेला आदिवासींचा विरोध; मुंबई विद्यापीठावर मोर्चा

‘पाणी कसं अस्तं’ कवितेला आदिवासींचा विरोध; मुंबई विद्यापीठावर मोर्चा

माथेफिरू कवी दिनकर मनवर याने अत्यंत अश्लील वर्णन करून आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली असून मुंबई विद्यापीठाने देखील कोणताही विचार न करता ती कविता बीएच्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत आता श्रमजीवी संघटनाच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. या माथेफिरू कवी दिनकर मनवर आणि बेजबाबदार विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ ठाणे, पालघर, रायगड आणि नसिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर ३० सप्टेंबर रोजी मोर्चा काढणार आहे. तर सोमवारी श्रमजीवी महिला ठिणगीच्या कार्यकर्त्या मुंबई विद्यापीठात धडकणार आहेत.

‘पाणी कसं अस्तं’

मुंबई विद्यापीठाच्या बीएच्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्याक्रमात ‘पाणी कसं अस्तं’ या शीर्षकाखाली प्रकाशित केलेल्या कवितेत आदिवासी मुलींची मानहानी करणारे, विनयभंग करणारे वर्णन केले आहे. या कवितेमुळे समाजात विशेषतः महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या महिला ठिणगीच्या कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले असून आता याविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे. रविवारी चार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती सरचिटणीस बाळाराम भोईर आणि विजय जाधव यांनी दिली आहे.

मुंबई विद्यापीठात धडक देणार

सोमवारी महिला ठिणगीच्या महिला आणि युवती मुंबई विद्यापीठात धडक देणार असून संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी श्रमजीवी महिला ठिणगीच्या जया पारधी आणि संगीता भोमटे यांनी केली आहे. रविवारच्या मोर्चानंतर सर्व महिला युवती पोलीस ठाण्यात जाऊन सर्वत्र गुन्हा दाखल करणार आहेत.

First Published on: September 29, 2018 5:28 PM
Exit mobile version