वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवतील बसेसने 20 जणांचे बळी घेतल्याच्या निषेधार्थ पालिका मुख्यालयासमोर पर्यावरण संवर्धन समितीकडून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारीला भुईगावात पालिकेच्या बसने कमल जोशी या महिलेला चिरडले होते. हा या परिवहन सेवेचा 20 वा बळी होता. परिवहन सेवेच्या नादुरुस्त, प्रदूषण करणार्या बसेसनी यापूर्वी 19 जणांचे बळी घेतले होते. रहदारीचे नियम न पाळता भरधाव जाणार्या बसेसमुळे पादचार्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही नियमांपेक्षा जास्त वेगाने पालिकेच्या बसेस धावत आहेत. त्यामुळे या सेवेच्या निषेधार्थ बळी गेलेल्या 20 जणांना पालिकेच्या मुख्यालयासमोरच श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी आयोजित केलेल्या या सभेत फादर दिब्रिटो मृतांना श्रद्धांजली वाहणार आहेत.