नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रौत्सव होय. नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी आनंदात असतो.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. नऊ दिवस देवांची पुजा त्या देवांना देव्हा-यातून बाहेर न काढता केली जाते. तर प्रत्येक घरी वेगवेगळया पद्धती असतात. घटस्थापनेला घरी सवाष्ण जेवायला बोलावले जाते तर काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतिक मानून तिची पुजा करून तिला जेवायला वाढतात. नऊ दिवस दीप तेवत असतो. काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात. रोज एक माळ देवाच्या डोक्यावरबांधली जाते. त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्व आहे, अशा एकूण नऊ माळा बांधल्या जातात.
काही घरांमध्ये देवा शेजारी धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात. नवव्या दिवशी होम हवन होतो. ब्राह्मण व सुवासिनींना जेवावयास बोलावले जाते. होमात कोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होमहवन होऊन याचे उद्यापन व विसर्जन विजयादशमीला होते. विजयादशमीला म्हणजेच दस-याला आपट्याच्या पानांची पुजा करून ह्या उत्सवाची सांगता होते. अशा पद्धतीने नवरात्रौत्सव आपल्याकडे साजरा करण्याची पद्धत आहे.