भाग ११ – आपत्ती व्यवस्थापन तज्ञ पवार साहेब

भाग ११ – आपत्ती व्यवस्थापन तज्ञ पवार साहेब

आपत्ती व्यवस्थापन तज्ञ पवार साहेब

३० सप्टेंबर १९९३ ची ती काळरात्र.गणपती विसर्जन करून सर्व मंडळी झोपेच्या आधीन झालेली. आणि अश्यात निसर्गाने किल्लारी या गावावर घाला घातला.एक जबरदस्त भूकंप आणि सगळं होत्याच नव्हतं झालं. पवार साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. सोबतच गृहखात्याचा कारभार देखील ते स्वतःच हाताळत होते.राज्यभरात चालू असलेल्या विसर्जन मिरवणुका व्यवस्थित सुरू आहेत ना..? कुठे काही गडबड नाहीये..? याची माहिती घेत ते जागेच होते. बहुतेक सगळ्या मिरवणूका शांततेत पार पडल्या आहेत हे कळल्यावर ते झोपायला गेले.

साडेतीन वाजता खिडक्यांची तावदाने थरथरू लागली.पलंग हलु लागला. भूकंप असल्याचं लगेचच सगळ्यांच्या लक्षात आलं. साहेबांनी लगेचच चौकशी केली. तर भूकंपाच केंद्र लातूर असल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

लगोलग साहेबांनी लातूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन लावायचा प्रयत्न केला.पण तिकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.काहीतरी मोठं अघटित घडलं आहे याची तात्काळ साहेबांना जाणीव झाली.

त्यांनी मग लगेचच आपल्या स्वीय साहयकांना फोन लावला.सकाळी ७ वाजता विमान तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या. ७ वाजून ४० मिनिटांनी साहेब लातूरला पोहचले देखील. तिथून लगेच किल्लारीकडे गाडी वळवण्यात आली.
गावच्या गाव निसर्गाने रात्रीत गाडली होती. त्याने केलेल्या विध्वंसाच चित्र सकाळच्या उजेडात आता दिसू लागलं होत. कल्पनेपलीकडचं महाभयंकर चित्र होत ते. स्वतंत्र भारतात महाराष्ट्राने कधीही न पाहिलेल्या एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला आता तोंड द्यायचं होत. पवार साहेबांनी तात्काळ कामाला सुरवात केली. आणि सकाळच्या ८.३० वाजल्यापासूनच मदतीला सुरवात देखील झाली.साडेआठ वाजता मिळालेली ही गती पुढे अनेक महिने एकाच लयीत होती.

विध्वंसाचा आकडा भयानक होता. ९७७४ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. १५,५६५ जण जखमी होते. ३०,००० च्या वर घर पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती.तर पडझड झालेली घर ११,१४० गुराढोरांचा तर आकडाच नाही.तर सगळी सरकारी कार्यालय भुईसपाट झालेली. या सर्वात कहर म्हणजे मुसळधार पावसाने सतत लावलेली हजेरी.

अश्या परिस्थितीत पवार साहेब स्वतः तळ ठोकून होते. ३ महिने त्यांनी आपलं कार्यालय सोलापूर येथे सर्किट हाऊसला हलवलं होत. तेथून ते दररोज उस्मानाबाद-लातूरच्या भूकंपग्रस्त भागात जात होते. कामाची वाटणी आणि विभागणी त्यांनी अतिशय काटेकोरपणे केली होती.

युरोपमधून त्यावेळी एक डॉक्टरांच पथक आलं होत. त्यात डॉ. हॅन्स ज्युसन होते. ते मदतकार्य आटपून वापस जाताना म्हणाले होते की, “आम्ही जिथं अश्या नैसर्गिक आपदांच्या जागी जातो,तिथं परिस्थिती वाईट असते.रोगराई पसरलेली असते. नियोजनाचा अभाव असतो,शिवाय आत्यंतिक गोंधळाची स्थिती असते..पण इथे मात्र तशी काहीच परिस्थिती नव्हती. याच संपूर्ण श्रेय राज्याचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांचं आहे..!”

कोणताही पूर्वानुभव नसताना केवळ सक्षम निर्णयक्षमतेच्या जोरावर आणि सामान्य जनतेसाठी झटायच्या प्रेरणेने पवार साहेबांनी किल्लारीतील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणली.देशात पुढे जेंव्हा जेंव्हा अश्या घटना घडल्या तेंव्हा सर्वांनीच साहेबांच मार्गदर्शन मागितल आहे.तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी यांनी देखील २००१ मध्ये पवार साहेबांना “राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीचे” उपाध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घातली होती. ते पण साहेब त्यावेळी विरोधी पक्षात असताना.

First Published on: July 31, 2020 1:40 AM
Exit mobile version