५ कोटी १५ लाखांची रोकड लुटणारे सापडले…समोर आली धक्कादायक माहिती

५ कोटी १५ लाखांची रोकड लुटणारे सापडले…समोर आली धक्कादायक माहिती

वसईः मुंबई-अहमदाबाद हायवेवर खानिवडे टोलनाका परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून अंगडीयाच्या ताब्यातील ५ कोटी १५ लाखांची रोकड पळवणार्‍या टोळीतील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अंगडीयाच्या ड्रायव्हरही यात सहभागी असल्याचे उजेडात आले असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील अंगडीया राजभाई ठक्कर यांनी दिलेली हवालाची ५ कोटी १५ लाख रुपयांची रोकड घेऊन कंपनीचा कर्मचारी श्रवण ठाकोर आणि अक्षय ठाकोर ड्रायव्हर बाबू स्वामी याच्यासोबत सूरतकडे निघाले होते. पहाटेच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद हायवेवर खानिवडे टोलनाक्याजवळ ड्रायव्हर बाबू स्वामी झोप येत असल्याच्या बहाण्याने गाडी बाजूला लावून तोंड धुण्यासाठी गाडीबाहेर पडला होता. त्याचवेळी दुसर्‍या गाडीतून आलेल्या पाच जणांनी पालघर पोलिसांच्या अँटी नार्कोटीस सेलचे अधिकारी असल्याची बतावणी करत कारची झडती घेण्यास सुरुवात केली.

तेव्हा श्रवण ठाकोर यांनी विरोध केला असता तोतया पोलिसांनी गाडीत ड्रग्ज, सोने आणि रोकड असल्याची माहिती असल्याचे सांगत गाडीसह श्रवण ठाकोर यांचे अपहरण केले. त्यानंतर पुढे श्रवण यांना गाडीतून खाली उतरवून पळ काढला. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास करत असलेल्या मीरा भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रायव्हर बाबू स्वामी याच्याकडे कसून चौकशी केली असता तोतया पोलिसांच्या लुटमारीचा प्रकार उजेडात आला.

ड्रायव्हर पण कटात सहभागी

रोकड घेऊन जात असल्याची माहिती ड्रायव्हर बाबू स्वामी यानेच टोळीला दिली होती. ठरल्याप्रमाणे बाबू स्वामीने हायवेवर गाडी थांबवल्यानंतर टोळीने गाडी पळवून नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्या फरार साथिदारांचा तसेच लुटून नेलेल्या रकमेचा शोध पोलीस घेत आहेत.

First Published on: March 21, 2024 6:44 PM
Exit mobile version