गतिरोधकाने आयुष्याचा प्रवास थांबवला

गतिरोधकाने आयुष्याचा प्रवास थांबवला
वाडा: वाडा ते भिवंडी या महामार्गावर पाहुणीपाडा या गावाजवळ असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीला झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अत्यंत बेजबाबदारपणे महामार्गांवर टाकलेल्या या गतीरोधकांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निवृत्त शिक्षक मच्छिंद्रनाथ बनसोडे आपल्या पत्नीसोबत रविवारी (दि.८ जानेवारी) वाडा येथे दुचाकीवरून येत असताना पाहुणीपाडा गावाजवळच असलेल्या गतिरोधकावर सकाळी ९ च्या सुमारास त्यांची गाडी घसरली. यावेळी मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी माधुरी मच्छिंद्रनाथ बनसोडे वय, ५५ वर्षे रा. विठ्लवाडी यांना गाडीवरून पडल्याने गंभीर दुखापत झाली. अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.  वाडा ते भिवंडी या महामार्गावर अनेक ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत मज्जाव करूनही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मनमानी करुन ते जबरदस्तीने टाकले आहेत. विशेष म्हणजे गतिरोधकांजवळ कुठल्याही प्रकारे फलक किंवा इशारा न दिल्याने अनेक वाहनचालक अपघातांना बळी पडतात हे या अपघाताने स्पष्ट झाले असून याची जबाबदारी घेणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
First Published on: January 9, 2023 10:21 PM
Exit mobile version