टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी अपघातात मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघरच्या चारोटी येथे त्यांच्या कारला अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब यांनी त्यांच्या मृत्यूची खातरमजा केली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला जात असताना त्यांची कार दुभाजकाला धडकली आणि त्यांचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा त्या गाडीत 4 जण उपस्थित होते; त्यातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले. मृत्यू झालेल्यांमध्ये सायरस मिस्त्री यांचासुद्धा समावेश आहे. जहांगीर दिनशा पंडोल, सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला असून, अनायता पंडोले (महिला), दरियस पांडोले हे दोघे गंभीर जखमी आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर चारोटी टोलनाक्याजवळ गुजरातवरून मुंबईला येताना हा अपघात झाला, डिवायडरला आदळून अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
Cyrus Mistry, former Chairman of Tata Sons, while travelling from Ahmedabad to Mumbai, died in a road accident after his car hit a divider. 4 people were present in the car; 2 died on spot & 2 were moved to hospital: Palghar police officials pic.twitter.com/nOlhZcKUZA
— ANI (@ANI) September 4, 2022
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सूर्या नदीवरील पुलावर हा भीषण अपघात झाला. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून, यात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झालाय. सायरस मिस्त्री हे देशातील एक ख्यातनाम व्यापारी आणि उद्योगपती होते, जे एका ट्रिलियनेअर कुटुंबातील होते. ते रिअल इस्टेट व्यावसायिक पालोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र होते. पालोनजी शापूरजी यांना एकूण चार मुले आहेत. सायरस मिस्त्री यांच्यापेक्षा एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. मोठ्या भावाचे नाव शापूर आणि बहिणींचे नाव लैला आणि अल्लू आहे. त्यांच्या एका बहिणीचा विवाह रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाला आहे. अशा प्रकारे ते रतन टाटा यांचे नातेवाईकही आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीसुद्धा सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबीयांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.