Dahanu Local: डहाणू लोकलचे अकरावे वर्ष, अकरा वर्षात फक्त दोनच फेर्‍या वाढल्या !

Dahanu Local: डहाणू लोकलचे अकरावे वर्ष, अकरा वर्षात फक्त दोनच फेर्‍या वाढल्या !

सफाळे, नवीन पाटील : १६ एप्रिल २०१३ रोजी डहाणू लोकल सुरू होऊन आज 16 एप्रिल 2024 रोजी ११ वर्षे पूर्ण होत आहेत आणि प्रवासी संख्याही वाढली आहे आणि ही संख्या वाढतच आहे. परंतु डहाणू लोकलच्या फेर्‍या वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वे कडून नकारात्मक भुमिका घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.मागील 11 वर्षात डहाणू लोकलच्या फक्त 2 फेर्‍याच वाढविण्यात आल्या आहेत. सध्या डहाणू लोकलच्या 19 अप 19 डाऊन अशा फेर्‍या होत असून त्याचे समिकरण 10+1+3+3+2=19 असे आहे. आणि या समीकरणाचे विश्लेषण केल्यास आपल्या लक्षात येईल की मागील 11वर्षात डहाणू लोकलच्या फक्त दोनच फेर्‍या कशा वाढल्या आहेत हे लक्षात येईल. पश्चिम रेल्वे डहाणू लोकलच्या फेर्‍या वाढवू शकत नसल्याबद्दल प्रामुख्याने खालीलप्रमाणे कारणे नेहमीच देत आली आहे आणि गंमत म्हणजे ही कारणे डहाणू लोकल सुरू होण्याआधी मेमू, शटल फेर्‍या वाढविणे मागण्यासाठी सुद्धा देत आली आहे.

देण्यात येणारी कारणे

1)मार्ग उपलब्ध नाही
2)लोकलचे रेक उपलब्ध नाहीत.
3)डहाणू येथे लोकल उभ्या करण्यासाठी जागा नाही.
4)लोकल चालविण्यासाठी मोटरमन आणि गार्डची कमतरता आहे.

 

कारणांवर प्रवाशांचे प्रश्न,म्हणणे

1) मार्ग उपलब्ध नाही, असे कारण दिले जाते हे जरी काही अंशी खरे मानले तरी अनेक मेल/ एक्सप्रेस सुरू केल्या जातात त्यावेळी वरीलप्रमाणे पथ कुठून उपलब्ध होतो हे कळण्यापलीकडे असते.
2) ज्यावेळी सामान्य लोकलच्या ऐवजी वातानुकूलित लोकल सुरू केल्या जातात तेव्हा सामन्य लोकल शिल्लक राहतात. त्यातील एक लोकलचा रेक डहाणू साठी देऊ शकतात किंवा इतक्या जलदगतीने वंदेभारत गाड्यांचे उत्पादन केले जाते. त्यात इएमयू रेकचे थोडेफार उत्पादन केल्यास नक्कीच मुंबई लोकलसाठी रेक उपलब्ध होऊ शकतात.
3) सध्या रात्री डहाणू येथे दोन लोकल आणि दोन मेमू वस्तीला असतात. तथापि डहाणू येथून पहाटे लवकर लोकल सोडायची झाल्यास एक लोकल घोलवड यार्ड तर एक लोकल वाणगाव यार्डला उभ्या करता येऊ शकतात .जेणेकरून डहाणूच्या आसपास किमान सहा गाड्या रात्री वस्तीला उभ्या राहू शकतात. तसेही दिवसांच्या फेर्‍यांसाठी लोकल कुठे उभ्या कराव्या, याचा प्रश्नच नाही. कारण येण्याजाण्याचे त्याप्रमाणे वेळापत्रक आखता येऊ शकते.
4) लोकल चालविण्यासाठी मोटरमन आणि गार्डची कमतरता कशी भरून काढायला हवी हा रेल्वेचा प्रश्न असून रेल्वेने अपेक्षित असलेल्या मोटरमन/गार्डच्या जागा त्वरित भरणे आवश्यक आहे आणि दोन रेक साठी नक्कीच तितके मोटरमन आणि गार्ड एडजस्ट होऊ शकतात. अशाच प्रकारची पच्छिम रेल्वे अनेक वेगवेगळी कारणे प्रसंगानुरूप नेहमीच देत आली असून त्यातीलच एक कोरोना काळात बंद केलेली 7:05 ची लोकल आणि ही लोकल पुन्हा सुरू करण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही असेच कारण दिले आहे. परंतु हीच लोकल डहाणू येथून सकाळी 7:05 ऐवजी 6:55 सोडल्यास कशाप्रकारे सुरू होते हे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुद्धा रेल्वे अधिकार्‍यांना भेटून सविस्तर चर्चा करून निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

पश्चिम रेल्वे आता नवीन एक कारण प्रवाशांना देत आहे की, विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्ण होताच डहाणू लोकलच्या अनेक जास्तीत जास्त फेर्‍या वाढविण्यात येतील. तथापि प्रश्न असा पडतो की, हा प्रकल्प नक्की केव्हा पूर्ण होणार? कदाचित 2030 साल सुद्धा उजाडले जाईल आणि आजपासून जरी पाहण्यास गेल्यास जवळजवळ 6 वर्षाचा मोठा कालखंड पार करावा लागणार असून या कालखंडात प्रवासी संख्या किती वाढेल ह्याचे गणित रेल्वेने लक्षात घेतले आहे का? रेल्वे प्रशासनास सर्व प्रवाशांच्या वतीने विनंती आहे की, डहाणू लोकलच्या सध्याच्या 19-19 ऐवजी एकूण किमान 25-25 अप-डाऊन अशा फेर्‍या सुरू करण्यात याव्यात, जेणे करून विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्ण होईस्तोवर खूप सोयीचे होईल.
-दयानंद पाटील, सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

First Published on: April 15, 2024 7:35 PM
Exit mobile version