नळपाणी पुरवठा योजनांना दुरुस्तीची घरघर

नळपाणी पुरवठा योजनांना दुरुस्तीची घरघर

मोखाडा: तालुक्यातील गाव पाड्यांना वर्षानुवर्षे भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या कायमची नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीमधील गाव तिथे नळपाणी पुरवठा योजना ठेकेदाराकडून कार्यान्वित करुन घेतल्या.त्यासाठी शासनाच्या ठक्कर बाप्पा योजना, पेसा निधी, सौर ऊर्जेवरील नळपाणी पुरवठा, जल जीवन मिशन अशा असंख्य योजनांतून करोडो रुपयांचा निधी खर्च करून टँकरमुक्त गाव पाड्ये करण्याचा केविलवाणा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.परंतु हा प्रयत्न प्रयत्नच राहीला असून बर्‍याचशा नळपाणी पुरवठा योजना दीर्घकाळ सक्षम राहण्याऐवजी अधिकारी व ठेकेदार आर्थिक सक्षम झाले आहेत.पालघर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी पाणी पुरवठा विभागासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करून खर्च केला जातो.मात्र या खर्चाच्या तुलनेत तालुक्यातील दोन चार नळपाणी पुरवठा योजना सोडल्यातर बहुतांश नळपाणी पुरवठा योजना निकृष्ट कामामुळे दीड दोन वर्षांतच बंद पडल्या आहेत तर काही नळपाणी पुरवठा योजना चार महिने चालू आणि आठ महिने बंद अशी अवस्था झाली आहे.

यामुळे त्या योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी नव्याने ग्रामपंचायतीकडून व पाणी पुरवठा विभागाकडून लाखो रुपयांचा खर्च केला जातो.म्हणजे नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती ही केवळ ठेकेदार व अधिकारी यांच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा आरोप वारंवार ग्रामसभेतून नागरिक करत असतात परंतु नाही त्यांच्या प्रश्नांना ग्रामपंचायतीकडून नाही कधी ठेकेदाराकडून उत्तर दिली जातात.त्यामुळे बंद पडलेल्या नळपाणी पुरवठा योजना ह्या केवळ ठेकेदार पोसण्यासाठी असाव्यात अशी चर्चा सध्या गाव पाड्यातील नागरिकांकडून होत आहे.

First Published on: April 28, 2024 10:53 PM
Exit mobile version