गणेशोत्सवातील निर्माल्यापासून खतनिर्मिती

गणेशोत्सवातील निर्माल्यापासून खतनिर्मिती

विरार : वसई -विरार शहर महानगपालिकेने इको फ्रेंडली गणेशोत्सव हा संदेश देत कृत्रिम तलावाची संकल्पना यशस्वी करून दाखवली. त्यानंतर,याचेच एक पुढचे पाऊल उचलत गणेशोत्सवातील निर्माल्यापासून खत तयार करण्याचा वसा घेतला होता. पालिकेच्या या अनोख्या उपक्रमाला यश आले असून गणेशोत्सवातील निर्माल्यापासून तब्बल ३.४ टन गांडूळ खत तयार झाले आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून हा प्रकल्प उभारण्याला अधिक प्राधान्य दिले. त्यानुसार पालिकेमार्फत गणेशोत्सवातील निर्माल्य स्वतंत्र जमा करण्याची व्यवस्था विसर्जन तलावावर करण्यात आली होती. यात एकूण १७ टन निर्माल्य जमा करण्यात आले. या जमा झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मितीसाठी हा प्रकल्प उमादेवी महिला बचत गट, के.जी.एन महिला बचत गट, उमादेवी महिला बचत गट व नजराना महिला बचत गट, एकविरा महिला बचत गट यांच्याकडे सोपवण्यात आला असून तीन महिने प्रक्रिया करून आता त्यापासून एकूण ३ हजार ४०० किलो गांडूळ खत निर्माण करण्यात आले आहे. या खताचा वापर उद्यानातील झाडांसाठी तसेच खाजगी सोसायटीसाठी करता येणार असल्याचे पालिकेमार्फत सांगण्यात आले.

वसई -विरार शहरात गणेशोत्सवामध्ये मोठया प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. महिला बचत गटांनी या निर्माल्यावर ३ महिने प्रक्रिया करून त्याचे गांडूळ खत तयार केले आहे.या उपक्रमामुळे प्रदुषण नियंत्रणासह महिला बचत गटांना रोजगानिर्मिती प्राप्त होणार आहे.
– डॉ. चारुशीला पंडित, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

First Published on: November 25, 2022 10:16 PM
Exit mobile version