Manor News: गावात पाणीबाणी, राखीव पाणी व्हाईट टॅपिंगला

Manor News: गावात पाणीबाणी, राखीव पाणी व्हाईट टॅपिंगला

मनोर: महामार्गाच्या व्हाईट टॅपिंगच्या कामासाठी दिवसरात्र सुरू असलेला बेसुमार पाणी उपसा गावाला पाणीटंचाईला कारणीभूत ठरत आहे.आठ ते दहा टँकरच्या माध्यमातून होत असलेल्या बेसुमार पाणी उपशामुळे दुर्वेस गावाची भूजल पातळी खालावल्याने ग्रामस्थांच्या कुपनलिकांमधील पाण्याने तळ गाठला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी मेहनत करावी लागत आहे. पाणी उपसा बंद करण्याकडे टँकर चालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.पाणीटंचाई रोखण्यासाठी पाणी उपसा करणारे टँकर बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावातून पूर्व बाजूला असलेली दगड खाण खोलवर खोदकाम करण्यात आली आहे.खोल असलेल्या दगड खाणीत पाण्याचे जिवंत झरे आहेत.

पावसाळा सुरू होईपर्यंत दगड खाणीत कायमस्वरूपी पाणी साठा उपलब्ध असतो.पाणी साठ्यामुळे गावाचा भूजल साठा टिकून राहत असल्याने गावाला पाण्याची टंचाई भेडसावत नाही. नुकताच महामार्गाच्या व्हाईट टॅपिंगच्या काम सुरू करण्यात आले आहे. व्हाइट टॅपिंगच्या कामासाठी दुर्वेस गावच्या हद्दीतील दगड खाणीतून पाण्याचा साठ्यामधून टँकरच्या माध्यमातून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. आठ ते दहा टँकर दिवसरात्र खाणीमधून पाण्याचा उपसा केला जात आहे.लाखो लिटर पाण्याचा उपसा सुरू असल्याने खाणी मधील पाणी साठा कमी होऊन पाण्याने तळ गाठला असून गावाची भूजल पातळी खालावली आहे.भूजल पातळी खालावल्याने ग्रामस्थांच्या कूपनलिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी मेहनत करावी लागत आहे. टँकर मार्फत सुरू असलेल्या पाणी उपशामुळे दुर्वेस गावात एप्रिल महिन्याच्या मध्यात पाणीटंचाई समस्या ग्रामस्थांना भेडसावणार आहे.

 

पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.पाणी उपसा करण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत कर्मचारी पाठवून मनाई करण्यात आली होती. परंतु टँकर चालक जुमानत नाहीत.टँकर चालक आणि मालकांना लेखी सूचना देण्यात येईल.

– आकाश विष्णू कडव,सरपंच, दुर्वेस ग्रामपंचायत.

First Published on: April 23, 2024 8:55 PM
Exit mobile version