Virar News: अनधिकृत इमारतीसाठी पायवाट बंद

Virar News: अनधिकृत इमारतीसाठी पायवाट बंद

वसईः विरार पूर्वेकडील कारगिलमधील एका अनधिकृत इमारतीसाठी जागा मालकाने या जागेतून जाणारी पायवाट बंद केल्याने परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रभाग समिती ब च्या अनधिकृत नियंत्रण कक्षाकडे या संदर्भात तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.मागील काही महिन्यांपासून कारगिलनगरमधील अनधिकृत बांधकामांनी पुन्हा जोर धरला आहे. कारगिलनगर-त्रिमूर्ती कंट्री बारच्या गल्लीतही एका जागा मालकाने अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या बांधकाम येथून जाणारी पायवाट बंद केल्याने परिसरातील रहिवाशांना आता वळसा घालून मनवेलपाडा गावात जावे लागत आहे. या इमारतीकरता महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. शिवाय सदर इमारती ही अडगळीच्या जागेत बांधली जात असल्याने भविष्यात ही इमारत धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इमारतीचा पूर्णत्वास आलेला जोता निष्कासित करून येथून जाणारी पायवाट मोकळी करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांची आहे. मात्र, महापालिकेने या तक्रारींची दखल अद्याप घेतलेली नाही. किंबहुना महापालिका अनधिकृत इमारत धारकांना प्रोत्साहन देत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

या अनधिकृत बांधकामासाठी याठिकाणी असलेली काही ताडाची झाडे तोडण्यात आली आहेत. या झाडांची मुळेही आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न जागा मालकाने केला आहे. विशेष म्हणजे या इमारत बांधकामात येणारी अडगळ दूर करण्याच्या प्रयत्नांत दोन महिन्यांपूर्वी आग पेटवण्यात आली होती. मात्र, ही आग नियंत्रणाबाहेर गेल्याने या आगीच्या झळा शेजारील इमारतींपर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्याची वेळ ओढवली होती. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही जागा मालकाने शहाणपण घेतलेले नाही. त्यात वसई-विरार महापालिकाही या अनधिकृत बांधकामांकडे लक्ष देत नसल्याने अनधिकृत बांधकाम नियंत्रण कक्षाची जबाबदारी असलेल्या प्रभारी सहाय्यक आयुक्त व अभियंत्यांच्या निलंबनाची मागणी होत आहे.

First Published on: April 28, 2024 10:43 PM
Exit mobile version