बोईसरमध्ये महिला असुरक्षित; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारातही वाढ

बोईसरमध्ये महिला असुरक्षित; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारातही वाढ

औद्योगिक नगरी बोईसर-तारापूर परिसरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून गावगुंड आणि रोड-रोमियोंच्या दहशतीने संध्याकाळनंतर महिलांना आपल्या घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. मागील तीन दिवसात बोईसर परीसरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या लागोपाठ दोन घटना घडल्या असून पोलिसांचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असून कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
बोईसर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी आणि घरफोडी याशिवाय अल्पवयीन मुलांचे अपहरण, अमली पदार्थ विक्री यासोबतच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत असल्याने पालक भयभीत झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी सालवड शिवाजी नगर येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. तर धोडीपूजा येथील एका लहान मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्यात आला होता.

सध्या शहरात अमली पदार्थांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत. त्याचबरोबर बोईसर शहरात काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटनेत ही वाढ झाली आहे. या घटना समाजाला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा विकृत माणसावर तात्काळ कठोर कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली. तर अशा घटनेना कुठे तरी आळा बसून बोईसरसह जिल्ह्यातील महिला स्वतःला सुरक्षितपणाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते.
– भावना विचारे, जिल्हा परिषद सदस्य, पालघर जिल्हा परिषद

तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर आणि परिसरात लाखो कामगार राहत असून यामध्ये परप्रांतिय कामगारांची संख्या लक्षणीय आहे. बोईसर परिसरातील धनानी नगर, दांडीपाडा, गणेश नगर, भैय्यापाडा, अवधनगर, धोडीपूजा, सालवड शिवाजीनगर या भागात असलेल्या झोपडपट्टीमध्ये अनेक गावगुंड, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार, अमली पदार्थ विक्री करणारे, सोनसाखळी चोरासारखे अट्टल गुन्हेगारांचे वास्तव्य आहे.

त्याचबरोबर शहरातील विविध शाळा-कॉलेजेस आणि क्लासेसचा परिसर, एसटी बस डेपो परिसर, ओसवाल ड्रिम हाऊस, गोकुळ स्विट कॉर्नर, यशपद्मा बैठक कॅफे, साईबाबा मंदिर, नवापूर नाका, यशवंतसृष्टी, चित्रालय परिसर, रेल्वे ट्रॅकनजीकची झोपडपट्टी, परमीट बार, पानटपऱ्या आणि पडीक जागा याठिकाणी रोडरोमिओ, गावगुंड, ड्रगिस्ट, चरशी, गांजाफूके, दारुडे, गर्दूल्ले यांचा दिवस-रात्र अड्डा जमत असतो. एमआयडीसीत काम करणाऱ्या महिला, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थींनी, बाजारात खेरेदीसाठी येणाऱ्या महिला यांची छेडछाड,अश्लील हावभाव, द्वीअर्थी भाष्य करत महिला आणि मुलींना खजील केले जात आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर महिला आणि मुलींना घराबाहेर पडणे कठिण झाले असून बाहेर गेलेली आपली मुलगी सुरक्षित घरी परतेल का या चिंतेत पालकवर्ग आहे.

हेही वाचा –

राज ठाकरेंच्या गाडीलाही भाजपची भुरळ? भाजप कार्यालयासमोर दिसली गाडी

First Published on: May 2, 2022 8:55 PM
Exit mobile version