नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी 10 राज्यांतील 96 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात 1710 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 360 उमेदवारांविरुद्ध फौजदारी खटले दाखल आहेत. उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मने (एडीआर) ही आकडेवारी दिली आहे.
चौथ्या टप्प्यातील 274 उमेदवारांनी आपल्याविरोधात गंभीर गुन्हे नोंदवले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली आहे.
तेलंगणातील 85 उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आंध्र प्रदेशातील 69, महाराष्ट्रातील 53 आणि उत्तर प्रदेशातील 30 उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
चौथ्या टप्प्यातील उमेदवारांपैकी 17 जण दोषी ठरले आहेत. 11 उमेदवारांवर खुनाचे गुन्हे तर 30 उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. तर 50 उमेदवारांवर महिलांवरील गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पाच उमेदवारांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.
एआयएमआयएमचे सर्व तीन, शिवसेनेचे तीनपैकी दोन, भारत राष्ट्र समितीचे 17 पैकी 10, काँग्रेसचे 61 पैकी 35, भाजपचे 70 पैकी 40, शिवसेना (उबाठा) चारपैकी दोन, टीएमसीच्या आठपैकी तीन आणि समाजवादी पक्षाच्या 19 पैकी सात उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे.
या टप्प्यातील 96 लोकसभा मतदारसंघांपैकी 58 टक्के मतदारसंघ संवेदनशील आहेत. या मतदारसंघात तीन किंवा त्याहून अधिक उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.