रोहे नगरपरिषदेचे ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाला कचराकुंडी समोरच हरताळ

रोहे नगरपरिषदेचे ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाला कचराकुंडी समोरच हरताळ

 

रोहे: देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगर व शहरे स्वच्छ रहावीत यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत रोहे अष्टमी नगरपरिषद ही स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवत नागरिकांचे मध्ये स्वच्छते बाबत जागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र याच ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाच्या जाहिराती समोरच असलेल्या कचराकुंडी समोर स्वच्छतेला हरताळ फासण्यात येत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.मुख्याधिकारी यांचे नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी रोहे अष्टमी शहरातील नागरिकांचे मध्ये आपल घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी चौकाचौकात फलक, रॅली, पथनाट्ये,सोशल मीडिया आदी माध्यमातून जनजागृती करत आहे.मात्र रोहे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, मेहेंदळे हायस्कूल सारख्या महत्वाच्या भागातील कचराकुंडी स्वच्छ ठेवण्याचे भान नगरपालिका ठेवताना दिसत नाही. एकूण नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देणारी नगरपालिका या अश्या कचऱ्याने ओतप्रोत भरलेल्या व आजुबाजूला पडलेल्या कचऱ्या मुळे  उकिरडा झालेल्या कुंड्यांवरुन नागरिकांना कोणत्या स्वच्छतेचा बोध आहे? असा सवाल शहरातील स्वच्छतेचा वसा घेतलेल्या नागरिकांमधून होत आहे.

सामाजिक संस्था, नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग
रोहे अष्टमी नगरपरिषद प्रशासन हे शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक मुक्त शहर, स्वच्छ शहर असे अभियान राबविण्याचा फक्त दिखावाच करत असल्याचे वेळोवेळी समोर येणाऱ्या वस्तुस्थिती वरुन समोर येत आहे.देशभरात ‘स्वच्छ सर्वेक्षण’राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने देशाचे पंतप्रधान,राज्याचे मुख्यमंत्री यांसह संबंधित विभागांचे मंत्री, माहिती व जनसंपर्क कार्यालय विविध माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करत आहे.रोहे अष्टमी शहरातही आजवर घरोघरी स्वच्छते बाबत , कचरा विलगिकरणाबाबत माहिती पत्रके वाटण्यात आली. नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी अधिकारी,कर्मचारी यांसह सर्व सामाजिक संस्था, नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग असणारी श्रमदान शिबिरे घेण्यात येत आहे.मात्र असे असताना आजही रोहे शहराच्या महत्वाच्या चौकात यांसह बाह्यवळण रस्ता,मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व प्रकारचा कचरा इतस्ततः टाकलेला दिसत आहे.

 

स्वाध्याय प्रणेते प.पु. पांडुरंग शास्त्री, डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे गाव

नागरिकांच्या घरातील व सोसायट्यांचे मधील कचरा हा घंटागाडीच्या वेळात गाड्यांमध्ये टाकण्यात येतो.मात्र त्यानंतर जमा झालेला कचरा हा जागोजागी बसवण्यात आलेल्या  ओला व सुका असे लिहिलेल्या कुंड्यांत टाकण्यात येतो. मात्र या कुंड्या वेळोवेळी नगरपरिषदेच्या सफाई विभागाकडून रिकाम्या करण्यात न आल्यामुळे त्यामधील कचरा हा बाहेर पडून तो संपूर्ण परिसर अस्वच्छ करत आहे.नगरपरिषद प्रशासन शासनाच्या निधीतून होणारी व खाजगी बांधकामे यांच्या साठी सदैव तत्परतेने सेवेत असल्याचे पहायला मिळते. मात्र शहर स्वच्छ ठेवत डॉ. चिंतामणराव देशमुख, स्वाध्याय प्रणेते प.पु. पांडुरंग शास्त्री यांचे गाव म्हणून ओळखणारे गाव स्वच्छतेबाबत राज्यासह देशभरात ओळखले जावे अशी भावना नगरपरिषद प्रशासना मध्ये दिसत नाही.

First Published on: November 24, 2022 9:19 PM
Exit mobile version