रायगड रस्त्याच्या कामासाठी गांधारी नदीतून अनधिकृत पाणी उपसा

रायगड रस्त्याच्या कामासाठी गांधारी नदीतून अनधिकृत पाणी उपसा

किल्ले रायगड रस्त्याचे काम दोन वर्षापासून ठप्प होत. सद्या या कामास पुन्हा सुरुवात झाली असून यासाठी लागणारे पाणी गांधारी नदीतून उपसा करून घेतले जात आहे. या परिसरातील ज्या गावांना जॅकवेलच्या माध्यमातून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो अशा ग्रामपंचायतींनी रस्त्याच्या कामाला पाणी उपसा करण्यास विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन तळोशी ग्रामपंचायतीने प्रशासनाला दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाण्यासाठी लाखो शिवभक्त दरवर्षी येत असतात. महाडपासून रायगड रस्ता अरुंद आणि वळणदार असल्याने या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होत असल्याने महाड रायगड रस्त्याचे रुंदीकरण व्हावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण शासनाकडून मंजूर करण्यात आले. महाड – रायगड हा मार्ग महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून सिमेंट काँक्रीटच्या माध्यमातून दोन पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. याचे काम २०१९ पूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र ठेकेदाराने हे काम अर्धवट अवस्थेत ठेवून पळ काढला होता. यामुळे या कामाची पुन्हा निविदा काढून संबंधित ठेकेदाराला बदलून नवीन ठेकेदार नेमण्यात आला आहे.

कोरोना महामारी आटोक्यात आल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. या कामासाठी लागणारे पाणी गांधारी नदीतील जॅकवेल शेजारी चापगाव आणि तळोशी गावाजवळ उपसा करून टँकरद्वारे पुरवले जात आहे. रस्त्यासाठी पाणी उपसा केला जात आहे त्या ठिकाणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत जॅकवेलद्वारे रस्त्यावरील गावांना पाणीपुरवठा केला जातो. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी या पाणी उपशाला विरोध दर्शवला आहे. जसजसा उन्हाळा सुरू होईल तसतसा गांधारी नदीमधील पाणीसाठा कमी होत जाऊन जॅकवेल कोरड्या होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. यामुळे सदर पाणी उपसा तात्काळ बंद केला जावा अशी मागणी शिवसेनेचे रायगड संपर्क प्रमुख रवींद्र तरडे यांनी केली आहे. पाणी उपसा सुरूच राहिल्यास ग्रामस्थांसह आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा देखील तरडे यांनी दिला आहे.

महाड – रायगड मार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने अद्याप जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे विभागाकडून कोणत्याच प्रकारची परवानगी घेतलेली नाही. यामुळे गांधारी नदीतून पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल.
– रमेश चितळकर, शाखा अभियंता जलसंपदा विभाग महाड

First Published on: February 16, 2022 8:14 PM
Exit mobile version