कठीण कठीण किती, निवड ही !

कठीण कठीण किती, निवड ही !

टी-20 वर्ल्डकप स्पर्धा वर्षभरावर आली असताना ( 18 ऑक्टोबर-15 नोव्हेंबर 2020) भारतीय संघ व्यवस्थापन (रवी शास्त्री-विराट कोहली) प्रयोग करण्यातच रमले आहेत. आयसीसी-टी-20 रँकिंगमध्ये भारत सध्या 5 व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियात होणार्‍या आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया जेतेपदाच्या शर्यतीत निश्चितपणे असेल. आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाने अजूनपर्यंत टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद पटकावलेले नाही. भारत, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका यांनी एकदा, तर विंडीजने दोनदा टी-20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याची किमया केली आहे. पाच वेळा वर्ल्डकप (वनडे) जिंकणारा ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात प्रथमच होणारा टी-20 वर्ल्डकप पटकावण्यासाठी उत्सुक असेल, परंतु यजमान ऑस्ट्रेलियाला इंग्लंड,न्यूझीलंड तसेच कोहलीच्या भारतीय संघाकडून कडव्या झुंजीसाठी तयार रहावे लागेल.

जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार यांची उणीव भारताला प्रकर्षाने जाणवते आहे. दोघेही दुरवापतीतून सावरत असून त्यांच्याऐवजी हैदराबादी खलील अहमदला संधी लाभली. खलीदची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी बघूनच त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. परंतु त्याच्या गोलंदाजीवर धावांची लयलूट केली जात असून ही चिंताजनक बाब / नवोदितांना संधी मिळायला हवी परंतु त्यांना थेट संघात संधी देण्याआधी राखीव खेळाडूत ठेवणे उचीत ठरेल.

जयप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, शमी, उमेश यादव इशांत शर्मा अशी तेज गोलंदाजाची फलटण भारताकडे मौजूद असून टी-२०, वनडे, कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली असून प्रतिस्पर्ध्यांचे २० बळी टिपण्याची किमया वारंवार केल्यामुळे परदेश दौर्‍यात कसोटी विजय (जोहन्सबर्ग ट्रेंट ब्रिज) भारताने मिळविले ऑस्टे्रलियात ७१ वर्षांनंतर कसोटी मालिका विजयाचे भारताचे स्वप्न साकार झाले ते बुमरा, भुवनेश्वर, शर्मा, इशांत शर्मा यांच्या भेदक मार्‍यामुळे. (वॉर्नर, स्मिथ, वर्षभराच्या बंदीमुळे या मालिकेत खेळू शकले नाहीत ही बाब देखील नजरेआड करता येणार नाही.)

अलिकडे क्रिकेटचा व्याप वाढत चालला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ( WTC) या अवलंब करण्यात आला असून २४० गुणांसह भारत अव्वल क्रमांकावर असून वनडेत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये मात्र भारत पहिल्या, दुसर्‍या नव्हे तर पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. कोटलावर बांगलादेशने भारताला पहिल्या टी-२० सामन्यात हरवले. ८ पराभवानंतर बांगलादेशचा हा पहिला वहिला विजय . विराट कोहलीच्या गैरहजेरी भारतीय संघाचे नेतृत्व करणार्‍या रोहीत शर्माला पत्रकारांच्या फैरींना सामोर जावे लागेल. प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत नवोदितांना संधी देण्यात आली.

गेल्या वर्षभरात टी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या पदरी विजयाच्या तुलनेत पराभवच अधिक पडले आहेत. विडींजवर विजय मिळविणार्‍या भारताला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागेल. दुबळ्या दक्षिण आफ्रिकेनेही भारताला १-१ असे बरोबरीत रोखले या मालिकांमध्ये भारत पूर्ण ताकदीनिशी उतरला नाही. दुखापतग्रस्त खेळाडूंना विश्रांती देण्यात आली तर काही जणांनी विश्रांती घेणे पसंत केले. कोहली, शमी यांना विश्रांती देण्यात आली. बुमरा, भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरत असल्यामुळे त्यांना विश्रांती आवश्यकच होती. बुमराऐवजी समावेश करण्यात आलेल्या खलील अहमदच्या डावखुर्‍या तेज मार्‍यावर बांगलादेशी फलंदाज तुटून पडले. अनुनभवी खलीलला अजून बरीच मेहनत करावी लागेल.

नवोदितांनी मिळालेल्या संधीचा लाभ उठवून भारतीय वनडे, कसोटी संघातील प्रवेशासाठी दार ठोठवायला हवे. ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप स्पर्धा ११ महिन्यानंतर आली असताना भारतीय संघाच्या ‘दुसर्‍या फळीच्या’ उभारणीसाठी प्रयत्न सुरू असन नवदीप सैनी, मयांक मार्कंडे, राहुल चहर, शिवम दुबे यांना संधी देण्यात आली आहे. वर्ल्डकपसाठी चाचपणी सुरू असून त्यात कोण बाजी मारतो ते बघायचे टी-२० मधील चांगल्या कामगिरीमुळे भारतीय वनडे, कसोटी संघातही काही खेळाडूंनी जागा पटकावली आहे.

नवोदितांना संधी देताना संघाच्या कामगिरीकडेही लक्ष द्यायला हवे. विजयाला प्राधान्य देताना नवोदितांनी काही गोष्टी शिकणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्ड कपपर्यंत भारतीय संघ किमान २३ टी-२० सामने खेळेल. प्रमुख खेळाडूंचे संघातील निवड निश्चित असली तरी तीन घटकांवर प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल. मधली फळी, अष्टपैलू आणि फिरकीपटूंवर भर द्यावा लागेल.

रविचंद्रन अश्विनसारखा अनुभवी कसोटीपटू वनडे तसेच टी-२० क्रिकेटसाठी उत्सुक असला तरी गेली दोन वर्ष तो संघाबाहेरच आहे. कसोटी तसेच आयपीएलवरच त्याला समाधान मानावे लागेल. यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव या फिरकी जोड गोळीने भारतीय वनडे, टी-२० क्रिकेट संघात जागा पटकावली आहे. इंग्लंडमधील (२०१९) वर्ल्ड कप स्पर्धेतही चहल, यादव जोडगोळी भारतीय संघात होती. ऑस्ट्रेलियातील खेळ पट्ट्यांवर चहल-यादवच्या मनगटी फिरकीला अधिक वाव मिळेल. लेग स्पीनर राहुल चहरचीही भर पडली असून विंडीज दौर्‍यानंतर राहुलला फारशी संधी लाभलेली नाही.

भारतीय संघाला चणचण भासते ती अष्टपैलू खेळाडूंची. दोन वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिका दौर्‍यात कर्णधार कोहलीला हार्दिक पंडयासारखा अष्टपैलू खेळाडू गवसला. त्याच्या मध्यमगती गोलंदाजीला जोड लाभली तो फलंदाजीची. हार्दिकनंतर त्याचा भाऊ कुणाल पंडया तसेच तामिळनाडूचा उंचपुरा युवा ऑफ स्पिनर फलंदाज वॉशिंग्टन सुंदर यांनाही निवड समितीने संधी दिली. प्रसाद यांच्या राष्ट्रीय निवड समितीने नवोदितांना संधी देताना रविंद्र जडेजा सारख्या अनुभवी अष्टपैलू खेळाडूकडे दुर्लक्षच केले, असे नमूद करावेसे वाटते. जडेजा वेळ प्रसंगी बॅटचा कुशलतेने वापर करू शकतो, तसेच त्याची डावखुरी फिरकी वनडे, टी-२० क्रिकेटसाठी उपयुक्त ठरते. शिवाय भरवशाचा क्षेत्ररक्षक असा त्याचा लौकिक आहे. अष्टपैलू खेळाडूंबाबत निवड समितीची धरसोड वृत्ती प्रकर्षाने दिसून येते. वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेला विजय शंकर, मनवा प्रसाद यांच्या निवड समितीला नकोसा झालेला दिसतो. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे विजय शंकरऐवजी मुंबईच्या युवा शुभम दुबेला संधी लाभली असून त्याचा तो कितपत फायदा उठवतो ते बघायचे.

मधल्या फळीतील जागेसाठी श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, मनीष पांडे, शुभम गिल, लोकेश राहुल यांच्यात चुरस आहे. रोहित शर्माचा सलामीचा साथीदार शिखर धनवला सद्या धावांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. परंतु, टी-२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होणार असून धवनचा खेळ ऑस्ट्रेलियातील टणक खेळपट्यांवर बहरतो. त्यामुळे त्याची निवड निश्चित वाटते. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंडया, रिषभ पंत यांचे निवड निश्चित असून मधल्या फळीतील एका जागेसाठी कोणाची वर्णी लागते ते बघायचे.

First Published on: November 10, 2019 5:22 AM
Exit mobile version