राष्ट्रकुल नेमबाजी, तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद भारताला!

राष्ट्रकुल नेमबाजी, तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद भारताला!

राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी भारताला मिळाली आहे. ही स्पर्धा जानेवारी २०२२ मध्ये होईल. २०२२ मध्येच बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम पदकतक्त्यातील देशांचे स्थान ठरवताना नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेत मिळवलेली पदके जोडली जाणार आहेत. याबाबतची घोषणा राष्ट्रकुल स्पर्धा फेडरेशनने (सीजीएफ) सोमवारी केली.

सीजीएफने मागील वर्षी बर्मिंगहॅम येथे होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) ही बाब आवडली नाही आणि ते या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याच्या विचारात होते. त्यामुळे सीजीएफला या निर्णयाबाबत पुनर्विचार करणे भाग पडले. राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा जानेवारी २०२२ मध्ये चंदीगडला होणार आहे. तर २०२२ मध्येच बर्मिंगहॅमला होणारी राष्ट्रकुल स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. चंदीगड आणि बर्मिंगहॅम या दोन्ही स्पर्धांमध्ये जिंकलेल्या पदकांच्या आधारे अंतिम पदकतक्ता तयार करण्यात येईल. बर्मिंगहॅमला होणार्‍या स्पर्धेचा समारोप झाल्यानंतर एका आठवड्याने सीजीएफ अंतिम पदकतक्त्याची घोषणा करेल.

First Published on: February 25, 2020 2:37 AM
Exit mobile version