भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने १४ मे रोजी शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने थॉमस चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तब्बल ७३ वर्षांनी पहिल्यांदाच भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत मलेशियावर विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. पण आत्ता केवळ कांस्य पदकावर समाधान न मनात थेट सुवर्णपदकाच्या शर्यतीत भारतीय बॅडमिंटन पुरुष संघाने धडक मारत उत्तम कामगिरी केली आहे.
पहिल्या पुरुष एकेरी सामन्यात डेन्मार्क व्हिक्टर आक्सेल्सेनने २१-१३, २१-१३या फरकाने सेनवर विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुहेरी सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी २१-१८, २१-२३, २२-२० या फरकाने रोमहर्षक विजय मिळवला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर श्रीकांत किदम्बीने आंद्रेसला पराभूत केले व भारताला २-१ आघाडी मिळवून दिली.
अटीतटीच्या या सामन्यात प्रणॉयने पुन्हा एकदा अविश्वसनीय कामगिरी करत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलवले. त्यामुळेच आत्ता भारतीय पुरुष बॅडमिंटन संघ थॉमस चषकात सुवर्ण पदक मिळवून भारताला जेतेपद मिळवून देणार का ? आणि हि अंतिम लढत कशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.