IND vs ENG : भारतीय संघाचे काही निर्णय आश्चर्यचकित करणारे; माजी क्रिकेटपटूची टीका 

IND vs ENG : भारतीय संघाचे काही निर्णय आश्चर्यचकित करणारे; माजी क्रिकेटपटूची टीका 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना गुरुवारी खेळला जाणार आहे. इंग्लंडने मंगळवारी झालेला तिसरा टी-२० सामना ८ विकेट राखून जिंकत या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत आपले आव्हान जिवंत ठेवायचे असल्यास भारताला आज होणारा सामना जिंकणे अनिवार्य आहे. मात्र, भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात घेतलेले काही निर्णय आश्चर्यचकित करणारे होते, अशा शब्दांत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणने भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली. भारताने आधीच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली होती. मात्र, त्याला फलंदाजी करायला मिळाली नाही. असे असतानाही भारताने सूर्यकुमारला तिसऱ्या सामन्यासाठी संघातून वगळले ही बाब लक्ष्मणला फारशी आवडली नाही.

ईशान तिसऱ्या क्रमांकावर का? 

भारतीय संघाने घेतलेले काही निर्णय आश्चर्यचकित करणारे होते. या निर्णयांमागे काही कारणे नक्कीच असतील. परंतु, ईशान किशनने पदार्पणाच्या सामन्यात सलामीला येताना अर्धशतकी खेळी केल्यानंतर त्याला पुढील सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याची गरज काय? तसेच सूर्यकुमार यादवला पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, असे असतानाही त्याला पुढील सामन्यासाठी संघातून का वगळण्यात आले? असे सवाल लक्ष्मणने उपस्थित केले.

कोहलीची अप्रतिम फलंदाजी

भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरत असताना कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे लक्ष्मणने कोहलीचे कौतुक केले. कोहलीने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने सुरुवातीला २५ चेंडूत २४ धावा करत भारताचा डाव सावरला. त्यानंतर मात्र अखेरच्या षटकांत त्याने धावांची गती वाढवली. अखेर त्याने ४६ चेंडूतच नाबाद ७७ धावांची खेळी केली. मात्र, त्याला इतरांची साथ न लाभल्याने भारताने सामना गमावला, असे लक्ष्मण म्हणाला.

First Published on: March 18, 2021 4:20 PM
Exit mobile version