IPL 2021 : RCB ने जेतेपद पटकावलेले नाही हे ऐकून कंटाळा आला – डिव्हिलियर्स 

IPL 2021 : RCB ने जेतेपद पटकावलेले नाही हे ऐकून कंटाळा आला – डिव्हिलियर्स 

एबी डिव्हिलियर्स 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे. या संघात कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल यांसारख्या उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे. परंतु, असे असतानाही बंगळुरूला अजून एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदा मात्र बंगळुरूचा संघ हा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास उत्सुक असल्याचे यष्टीरक्षक-फलंदाज डिव्हिलियर्स म्हणाला. तसेच यंदाच्या स्पर्धेत कोणत्याही संघाला आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नसल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होईल असे त्याला वाटते.

कशाप्रकारे जल्लोष करेन सांगणे अवघड

आठही संघांना आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरायचे आहे. मलासुद्धा ही स्पर्धा जिंकायला आवडेल. आम्ही जर जेतेपदाचा दुष्काळ संपवला, तर मी कशाप्रकारे जल्लोष करेन हे सांगणे अवघड आहे. आम्ही अजून एकदाही स्पर्धा जिंकलेली नाही. मात्र, मला ही गोष्ट ऐकून कंटाळा आला आहे. आयपीएल ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा असून आम्ही या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहोत, असे डिव्हिलियर्सने सांगितले.

यंदाची स्पर्धा अधिक चुरशीची

कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार नाही. त्यामुळे प्रत्येक संघाला परिस्थितीशी आणि खेळपट्टीशी जुळवून घ्यावे लागणार आहे. प्रत्येक संघाला वेगवेगळ्या परिस्थितीत खेळावे लागणार आहे. त्यामुळे यंदाची स्पर्धा अधिक चुरशीची होईल. काही संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे खूप अवघड असते. त्या संघांना आता त्रयस्थ ठिकाणी खेळणे अवघड जाऊ शकेल, असे डिव्हिलियर्स म्हणाला.

First Published on: April 17, 2021 9:51 PM
Exit mobile version