इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला ३ विकेट राखून पराभूत केले. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १४७ अशी धावसंख्या उभारली होती. याचा पाठलाग करताना राजस्थानची ५ बाद ४२ अशी अवस्था होती. मात्र, डेविड मिलर (६२) आणि क्रिस मॉरिस (नाबाद ३६) या दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनी अप्रतिम फलंदाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. दिल्लीच्या गोलंदाजांनी राजस्थानला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला चार षटके पूर्ण करू दिली नाही. अश्विनने तीन षटकांत केवळ १४ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याला चौथे षटक न देणे ही आमची चूक झाल्याचे दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने कबूल केले.
Not our thriller 😔
Onwards and upwards 👊🏻#YehHaiNayiDilli #RRvDC #IPL2021 pic.twitter.com/5TBzyrbOxC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 15, 2021
गोलंदाजीत थोडा बदल केला
अश्विनला आम्ही चारही षटके टाकण्याची संधी दिली पाहिजे होते. याबाबत मी संघाच्या बैठकीत नक्कीच चर्चा करेन. अश्विनने अप्रतिम गोलंदाजी केली. तीन षटकांत त्याने केवळ १४ धावा दिल्या. राजस्थानच्या फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीवर एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही. त्याला पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. परंतु, त्याने त्यानंतर खूप मेहनत घेतली. त्याने त्याच्या गोलंदाजीत थोडा बदल केला. त्यामुळे या सामन्यात त्याला यश मिळाले. त्याला चौथे षटक न देणे ही आमची चूक होती, असे पॉन्टिंग सामन्यानंतर म्हणाला.