महेंद्रसिंग धोनीला गेल्या काही काळात सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आलेले नाही. आशिया चषकातही त्याचे फलंदाजीतील प्रदर्शन अगदी साधारण होते. त्यामुळे भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादने धोनीला आपल्या फलंदाजीवर मेहनत घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
धोनीने खेळ सुधारणे आवश्यक
प्रसाद धोनीच्या फलंदाजीबाबत म्हणाला, “भारताने आशिया चषक जिंकला असला तरी भारताच्या मधल्या फळीने चांगले प्रदर्शन नाही केले. त्यातच महेंद्रसिंग धोनीचे प्रदर्शन अगदी साधारण होते. त्यामुळे धोनीला फलंदाजीवर मेहनत घेण्याची गरज आहे. त्याने आपला खेळ सुधारणे आवश्यक आहे. भारताकडे रिषभ पंतच्या रूपात चांगला पर्याय उपलब्ध आहे. पण धोनीने चांगली फलंदाजी केली नसली तरी त्याचे यष्टिरक्षण खूप चांगले होते.”
भुवनेश्वर आणि बुमराहचे प्रदर्शन वाखाणण्याजोगे
प्रसादने भारताचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांची स्तुती केली. तो म्हणाला, “दुबईमधील फलंदाजीला अनुकूल परिस्थितीतही भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी ज्याप्रकारे गोलंदाजी केली ते वाखाणण्याजोगे होते. तर भारताचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनीही चांगले प्रदर्शन केले. रोहितने संघाचे नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने केले.”