भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत पराभूत झाला. तिसरा आणि निर्णायक सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली असून या पराभवाचे खापर भारताच्या बॅटिंगवर फोडले जात होते. विशेषत: भारताची मधली फळी काही खास कामगिरी करू शकली नसल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. अशावेळी मधल्या फळीतील महत्त्वाचा आणि अनुभवी बॅट्समन महेंद्रसिंग धोनीही काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने या मालिकेच्या दुसर्या सामन्यात ५९ चेंडूंत ३७ धावा केल्या. तसेच तिसर्या सामन्यात धोनीने ६६ चेंडूंत ४२ धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसह अनेकांनी धोनीवर टीका केली होती. याच टीकाकारांमध्ये आता गौतम गंभीरही सामील झाला आहे.
नक्की काय आहे गंभीरचे विधान?
धोनीच्या बॅटिंगबद्दल गंभीर म्हणाला, “धोनी सध्या ज्या संथपणे फलंदाजी करतो आहे त्यामुळे इतर फलंदाजांवर दबाव येत आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यामध्ये खूप डॉट बॉल खेळले. त्याचा परिणाम इतर खेळाडूंवर झाला. आदिल रशीद आणि मोईन अली या इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना त्यांना हवे तसे चेंडू टाकता आले, कारण धोनी त्यांना मारण्याचा प्रयत्नच करत नव्हता. धोनी एक असा फलंदाज आहे जो आपल्या डावाच्या सुरुवातीला थोडा वेळ घेतो. मात्र, अखेरच्या १० षटकांत तो आक्रमक खेळतो. पण हे या २ सामन्यांमध्ये पाहायला मिळाले नाही. त्यामुळे धोनीने आपल्या फलंदाजीतील काही बाबींवर जास्त मेहनत घेणे आवश्यक आहे. एखादा फलंदाज जेव्हा डावाच्या सुरुवातीला वेळ घेतो तेव्हा त्या फलंदाजाने डावाच्या अखेरपर्यंत खेळणे आवश्यक असते.”
गांगुलीनेही केला होता आरोप
गंभीरआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही धोनीच्या फलंदाजीवर टीका केली होती. गांगुलीनुसार जर धोनीला २०१९ मध्ये होणार्या विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवायचे असेल, तर त्याला कामगिरी सुधारण्याची गरज आहे.