लोकांच्या अपेक्षांची भीती वाटते – स्वप्ना बर्मन

लोकांच्या अपेक्षांची भीती वाटते –  स्वप्ना बर्मन

स्वप्ना बर्मन (सौ-Moneycontrol)

काही महिन्यांपूर्वी जकार्ता येथे झालेल्या एशियाड स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताच्या स्वप्ना बर्मनने हेप्टाथलॉन या खेळात सुवर्णपदकाची कमाई केली होती. एशियाड स्पर्धेत हेप्टाथलॉनमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. तिने दात आणि पाठ दुखत असतानाही सुवर्णपदक कमावले. त्यामुळे लोकांच्या तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा चांगला खेळ करण्यासाठी प्रेरणा देत असल्या तरी त्यांची भीती वाटते असे स्वप्ना म्हणाली.

संपूर्ण देशाला माझ्याकडून ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा

स्वप्ना याबाबत म्हणाली, “एशियाडमध्ये पदक जिंकल्यापासून माझ्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. आधी माझे आई-वडील आणि प्रशिक्षक हे माझ्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा करायचे. पण आता संपूर्ण देशाला माझ्याकडून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. मला या अपेक्षांची भीती वाटते. जर मी पदक जिंकले नाही तर काय हा विचार सतत माझ्या डोक्यात चालू राहतो. पण मी ऑलिम्पिकसाठी खूप मेहनत घेईन आणि जर लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील तर मला चांगले प्रदर्शन करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.”

एशियाडमध्ये सुवर्णपदक

हेप्टाथलॉन या खेळात ७ विविध स्पर्धा असतात. एशियाडमध्ये स्वप्ना बर्मनने १०० मीटर शर्यतीत ९८१, उंच उडीमध्ये १००३, गोळाफेकमध्ये ७०७, २०० मीटर शर्यतीत ७९०, लांब उडीमध्ये ८६५, भालाफेकमध्ये ८७२ आणि ८०० मीटर शर्यतीत ८०८ गुणांसह एकूण ६०२६ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले होते. 
First Published on: October 5, 2018 10:18 PM
Exit mobile version