प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट

प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट

एम.आय.जी.ला विजेतेपद

स्वप्नील साळवीच्या तुफानी नाबाद ७१ धावांच्या खेळीमुळे एम.आय.जी. क्रिकेट क्लबने अंतिम सामन्यात शिवाजी पार्क जिमखान्याचा ५ विकेट राखून पराभव करत प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. शिवाजी पार्क जिमखान्याने उभे केलेले २३५ धावांचे डोंगराएवढे आव्हान एम.आय.जी.ने १० चेंडू राखूनच पार केले. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्वप्नील साळवीला तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून एम.आय.जी.च्या शम्स मुलानीला गौरविण्यात आले.

या सामन्यात एम.आय.जी.ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शिवाजी पार्क जिमखान्याने निर्धारित २० षटकांत ७ विकेट गमावत २३४ धावा केल्या. त्यांच्या आकाश आनंद (९६) आणि निनाद कदम (८४) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. या दोघांनी ३८ चेंडूत १०१ धावांची भागीदारी केली.

हे कठीण आव्हान पार करण्यासाठी एम.आय.जी.ला चांगल्या सुरुवातीची गरज होती. ती सुरुवात त्यांना स्वप्नील प्रधान आणि अर्जुन तेंडूलकर करून दिली. त्यांनी ४६ धावांची भागीदारी केली. यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत गेल्याने एम.आय.जी.ची १२.३ षटकात ५ बाद १३६ अशी काहीशी बिकट अवस्था झाली. मात्र, यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या गौरव जठार (नाबाद २८) आणि स्वप्नील साळवी (नाबाद ७१) यांनी अप्रतिम फलंदाजी करत एम.आय.जी.ला हा अंतिम सामना जिंकवून दिला.

संक्षिप्त धावफलक –

शिवाजी पार्क जिमखाना : २० षटकांत ७ बाद २३४ (आकाश आनंद ९६, निनाद कदम ८४; आतिश गावंड ४३/२, निखील दाते ४८/२) पराभूत वि. एम.आय.जी. : १८.२ षटकांत ५ बाद २३५ (स्वप्नील साळवी नाबाद ७१, स्वप्नील प्रधान ३७, सुमीत घाडीगावकर ३०, केव्हिन अल्मेडा ३०; सिद्धार्थ कोटक २६/२, संकेत भाये ३८/२)

First Published on: April 15, 2019 4:01 AM
Exit mobile version