भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉवर मागील काही काळात बरीच टीका झाली आहे. पृथ्वीला मागील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. तसेच ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेतही त्याने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. मात्र, त्याने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. मुंबईकडून खेळताना या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने दिल्लीविरुद्ध नाबाद १०५ धावांची खेळी केली होती. तर गुरुवारी पृथ्वीने उत्कृष्ट फलंदाजी करताना पुदुच्चेरीविरुद्ध नाबाद २२७ धावा चोपून काढल्या. या खेळीसह त्याने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. भारतीय स्थानिक क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यात कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
RECORD ALERT 👍👍
Prithvi Shaw, after scoring 227* vs Pondicherry in the @Paytm #VijayHazareTrophy, now has the highest List A score by a captain in Men’s cricket. 👏👏 #CAPvMUM | @MumbaiCricAssoc
Follow the match 👉 https://t.co/udXu4rr12o pic.twitter.com/PVjGu9XBka
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 25, 2021
एकूण आठवा फलंदाज
पुदुच्चेरीविरुद्ध मुंबईकर पृथ्वीने १५२ चेंडूत नाबाद २२७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३१ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. हे पृथ्वीचे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक ठरले. तसेच स्थानिक एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पृथ्वी हा भारताचा एकूण आठवा फलंदाज ठरला.
मुंबईच्या ४५७ धावा
तसेच पृथ्वीने संजू सॅमसनला (२१२) मागे टाकत भारतीय स्थानिक क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला. पृथ्वीच्या द्विशतकामुळे मुंबईने ५० षटकांत ४ बाद ४५७ अशी धावसंख्या उभारली. पृथ्वीला सूर्यकुमार यादवने १३३ धावा करत उत्तम साथ दिली.