सगळे नियम सर्वांना लागू, अपवाद केवळ कोहलीचा – सेहवाग

सगळे नियम सर्वांना लागू, अपवाद केवळ कोहलीचा – सेहवाग

विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहली संघामध्ये सतत बदल करण्यासाठी ओळखला जातो. एखाद्या खेळाडूला एक-दोन सामन्यांत चांगला खेळ करण्यात अपयश आल्यास त्या खेळाडूच्या जागी कोहली दुसऱ्या खेळाडूला संधी देत असल्याचे वारंवार पाहायला मिळाले आहे. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी मनीष पांडेला संघात स्थान मिळाले होते. श्रेयसला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (३ सामन्यांत ५९ धावा) चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र, त्याने त्याआधी न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका आणि आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला होता. त्यामुळे त्याला संघातून वगळले जाणे भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागला आवडले नाही.

श्रेयसने याआधीच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली होती. मग असे असतानाही त्याला पहिल्या टी-२० सामन्यात संघात स्थान का मिळाले नाही? त्याला वगळण्यामागे काय कारण होते, हे श्रेयसने कर्णधाराला जाऊन विचारले असेल, असे मला वाटत नाही. श्रेयसला वगळल्याने संघाचा फायदा होणार असेल, तर ठीक. मात्र, त्याला उसळी घेणारे चेंडू खेळता येत नाहीत असा विचार करून त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळत असेल, तर ते चुकीचे आहे. सगळे नियम सर्वांना लागू आहेत, अपवाद फक्त विराट कोहलीचा. त्याला कोणतेही नियम लागू पडत नाहीत. तो फॉर्ममध्ये नसताना त्याला संघातून वगळले जात नाही किंवा त्याच्या फलंदाजीच्या क्रमात बदल केला जात नाही. हे योग्य आहे का? असा सवाल सेहवागने उपस्थित केला.

First Published on: December 7, 2020 7:52 PM
Exit mobile version