भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदात कसोटी मालिकेचे बिगुल याच महिन्यात वाजणार आहे. मात्र या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेटमध्ये खूप उलथापालथ पाहायला मिळाली. विराट कोहलीने टी-२० च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्या कडून एकदिवसीय संघाचे देखील कर्णधारपद काढून घेतले आणि या दोन्ही फॉरमॅटसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. यादरम्यानच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले होते की, त्यांनी वैयक्तिकरित्या विराटला टी-२० मधून कर्णधारपद न सोडण्याबाबत सांगितले होते.
मात्र, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत हे सांगून सर्वांना हैरान केले की, बीसीसीआयकडून कोणत्याही प्रकारे त्याला टी-२० चे कर्णधारपद न सोडण्याबाबत सांगितलेच नव्हते. मात्र आतापर्यंत या आरोपांवर कोणाचीच माहिती समोर आली नाही.
दरम्यान, गांगुलींचे कोहलीबाबत एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. गांगुली नुकतेच गुरुग्राममध्ये एका कार्यक्रमात पोहोचले होते. तिथे त्यांना प्रश्न विचारला की त्यांना कोणत्या खेळाडूची वृत्ती पसंद आहे. यावर गांगुली यांनी म्हटले की, “मला विराट कोहलीची वृत्ती पसंद आहे मात्र तो लढाई खूप करतो.”
आम्ही कोहलीच्या प्रकरणाची चौकशी करू
भारतीय संघाचे माजी कर्णधार गांगुली यांनी पूर्ण कार्यक्रमादरम्यान कोहलीच्या पत्रकार परिषदेबाबत कोणतेही भाष्य केले नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोहलीच्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्या बाबतीत त्यांनी आता सध्या काही बोलणार नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणाबाबत आम्ही चौकशी करू तुम्ही हे सगळे बीसीसीआयवर सोडून द्या असे त्यांनी म्हटले होते.