T20 World Cup : यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारताऐवजी युएईत होणार; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती

T20 World Cup : यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारताऐवजी युएईत होणार; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती

टी-२० वर्ल्डकप युएईत होणार; बीसीसीआयने आयसीसीला कळवले

यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारताऐवजी युएईमध्ये आयोजित करावा लागणार असल्याचे आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कळवले असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत असला तरी कोरोनावर अजूनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारताबाहेर हलवणे बीसीसीआयला भाग पडले आहे. यंदा टी-२० वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. परंतु, या स्पर्धेच्या तारखा अजून निश्चित झालेल्या नाहीत.

टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक आयसीसी ठरवेल

टी-२० वर्ल्डकप संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे हलवण्याबाबत आम्ही अधिकृतरीत्या आयसीसीला कळवले आहे, असे गांगुली म्हणाला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही गांगुलीने दिलेल्या माहितीला दुजोरा दिला. आम्ही टी-२० वर्ल्डकप युएई येथे हलवत आहोत. या संदर्भात आज आम्ही आयसीसीला माहिती देणार आहोत. टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक आयसीसी ठरवेल, असे जय शाह म्हणाले.

स्पर्धेचे आयोजन बीसीसीआय करणार

या महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीच्या मंडळाची बैठक झाली होती. त्यावेळी भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहून टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयला चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला होता. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने अखेर बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकप भारताबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही स्पर्धा युएईमध्ये होणार असली तरी या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयच करणार आहे.

First Published on: June 28, 2021 3:44 PM
Exit mobile version