निवडकर्ते अनुष्का शर्माला चहा द्यायचे काम करत होते!

निवडकर्ते अनुष्का शर्माला चहा द्यायचे काम करत होते!

फारुख इंजिनियरांचा हल्लाबोल

एम.एस.के प्रसाद अध्यक्षीय बीसीसीआयच्या निवड समितीवर वारंवार टीका होत असते. आता भारताचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज फारुख इंजिनियर यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. भारताच्या निवड समिती सदस्यांना मिळून १०-१२ कसोटी संघांचा अनुभव आहे. मग ते निवडकर्ते झालेच कसे असा प्रश्न इंजिनियर यांनी उपस्थित केला आहे. तसेच हे निवडकर्ते विश्वचकदरम्यान कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला चहा द्यायचे काम करत होते, असे इंजिनियर म्हणाले.

भारताचा संघ निवडताना विराट कोहली महत्त्वाची भूमिका बजावतो, जी खूप चांगली गोष्ट आहे. आपली निवड समिती ही मिकी माऊस निवड समिती आहे. ते निवडकर्ते होण्यासाठी पात्र कसे झाले? त्या सर्वांनी मिळून १०-१२ कसोटी सामने खेळले आहेत. विश्वचषकादरम्यान मी निवड समितीच्या एका सदस्याला भेटलो.

मात्र, तो कोण आहे हे मला माहितही नव्हते. त्याने भारताचा ब्लेझर घातला होता आणि मी निवड समिती सदस्य आहे असे तो म्हणाला. भारताचे निवडकर्ते फक्त अनुष्का शर्माला चहा आणून देण्याचे काम करत होते. माझ्या मते दिलीप वेंगसरकरसारखा व्यक्ती निवड समितीत असला पाहिजे, असे इंजिनियर म्हणाले.

खोटे आरोप करू नका -अनुष्का

भारताचे निवडकर्ते विश्वचषकादरम्यान अनुष्का शर्माला चहा द्यायचे काम करत होते, असे विधान फारुख इंजिनियर यांनी केले. मात्र, अनुष्काने हे आरोप खोटे असल्याचे सांगितले. माझे नाव वापरून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. विश्वचषकादरम्यान निवडकर्ते मला चहा आणून देत होते, या गोष्टीत जराही तथ्य नाही. मी विश्वचषकात एक सामना पाहिला आणि त्यावेळी मी खेळाडूंच्या कुटुंबांसाठी बनवण्यात आलेल्या कक्षेत बसले होते. तिथे निवड समितीचा कोणताही सदस्य आला नाही. तुम्हाला जर निवड समितीवर भाष्य करायचे असेल, तर नक्की करा. मात्र, ते करताना माझे नाव वापरण्याची काहीच गरज नाही, असे अनुष्काने सोशल मीडियावर म्हटले.

First Published on: November 1, 2019 4:04 AM
Exit mobile version