Under-19 Asia Cup: भारताच्या युवा संघानेही जिंकला सहाव्यांदा आशिया चषक

Under-19 Asia Cup: भारताच्या युवा संघानेही जिंकला सहाव्यांदा आशिया चषक

भारतीय अंटर १९ क्रिकेट संघाचे युवा शिलेदार

जवळपास एक महिन्याच्या आतच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताने बांग्लादेशच्या क्रिकेट संघाला नमवत सातव्यांदा आशिया चषक जिंकला होता. त्यानंतर आज भारताच्या अंडर १९ संघानेही श्रीलंकेला १४४ धावांनी धुळ चारत सहाव्यांदा युवा आशिया चषक जिंकला आहे. बांग्लादेशात संपन्न झालेल्या या स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूंनी अप्रतिम खेळ करत क्रिकेट चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. भारतीय युवा संघाने याआधी १९८९, २००३, २०१२, २०१३-१४, २०१६ आणि आता २०१८ व्या वर्षातही जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत विकेट्सच्या बदल्यात ३०४ रन्स केले होते. भारताकडून यशस्वी जयस्वालने ८५ आणि अनुज रावत याने ५७ रन्स करत पहिल्या विकेटसाठी १२१ रन्सची भागीदारी केली. त्यानंतर देवदत्त पडीक्कल (३१), कर्णधार सिमरन सिंहने नाबाद ६५ तर आयुष बदोनी याने नाबाद ५२ रन्सची खेळी केली. श्रीलंकेची सुरुवात थोडीशी अडखळतच झाली. २० रन्सवर असताना निपुण धनंजय १२ रन करुन बाद झाला. त्यानंतर निशाण (४९ रन) आणि पसिंदू सुरियाबंदरा (३१ रन) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ६६ रन्सवर असताना पसिंदूची विकेट श्रीलंकेने गमावली आणि त्यानंतर एकापाठोपाठ विकेट जाण्याचे सत्र सुरु राहिले. शेवटी ३८.४ ओव्हरमध्ये १६० रन्स करुन श्रीलंकेचा संघ ऑल आऊट झाला.

भारताकडून हर्ष त्यागीने १० ओव्हरमध्ये ३८ रन्स देत श्रीलंकेच्या ६ विकेट्स घेतल्या. तर सिद्धार्थ देसाईने २ आणि मोहित जांगराने एक विकेट घेतली. हर्ष त्यागीच्या उत्कृष्ट खेळासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारने गौरविण्यात आले तर यशस्वी जयस्वालला मॅन ऑफ द सिरीजचा खिताब देण्यात आला.

 

First Published on: October 7, 2018 7:55 PM
Exit mobile version