नवख्या छत्तीसगढची मुंबईवर 5 गड्यांनी मात

नवख्या छत्तीसगढची मुंबईवर 5 गड्यांनी मात

अमनदीप खरे

विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. नवख्या छत्तीसगड संघाने मुंबईवर अटीतटीच्या सामन्यात ५ विकेट राखून मात केली. फलंदाजांनी चांगली कामगिरी करुनही गोलंदाजांनी केलेल्या स्वैर मार्‍यामुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने विजयासाठी दिलेले ३१८ धावांचे आव्हान छत्तीसगडने पूर्ण करत विजय साजरा केला. अमनदीप खरेच्या(117) नाबाद शतकी खेळाच्या जोरावर छत्तीसगढने पहिल्या विजयाची नोंद केली.

नाणेफेक जिंकत छत्तीसगडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जय बिस्ता आणि आदित्य तरे या मुंबईच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. शशांक सिंहने जय बिस्ताला माघारी धाडत मुंबईला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर आदित्य तरे, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांनी फटकेबाजी करत मुंबईला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. आदित्य तरेने मुंबईकडून सर्वाधिक ९० धावा केल्या, त्याला सूर्यकुमार यादवने ८१ धावा करत चांगली साथ दिली. कर्णधार श्रेयस अय्यरनेही ५० धावा केल्या.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना छत्तीसगडच्या संघाची सुरुवात खराब झाली. शशांक चंद्रशेखर धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर जिवनज्योत सिंह आणि आशुतोष सिंह यांनी छोटी भागीदारी करत छत्तीसगडचा डाव सावरला. शम्स मुलानीने दोन्ही फलंदाजांना माघारी धाडत छत्तीसगडला धक्के दिले. मात्र यानंतर मैदानात आलेल्या अमनदीप खरेने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत छत्तीसगडला विजय मिळवून दिला. खरेने ९४ चेंडूत ११७ धावा केल्या. मुंबईकडून शम्स मुलानीने २ बळी घेत चांगली झुंज दिली.

First Published on: September 29, 2019 5:10 AM
Exit mobile version