भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे भारतीय संघातील जलदगती गोलंदाजांना आयपीएलमधून वगळण्याची विनंती केल्याचे समजते आहे. विशेष करून जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्याबद्दल कोहलीने ही मागणी केल्याची माहिती समोर येते आहे. क्रिकेट प्रशासकीय समितीच्या बैठकीत कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, प्रशिक्षक रवी शास्त्री, निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत विराटने ही मागणी केली आहे.
वर्ल्डकपसाठी वेगवान गोलंदाज हवेत फिट
३० मे २०१९ पासून इंग्लंडमध्ये वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपचे वेळापत्रक लक्षात घेऊन यंदा आयपीएलचे आयोजन हे मार्च महिन्यात करण्यात आलेले आहे. आगामी वर्ल्डकप लक्षात घेता संघातील प्रमुख खेळा़डूंना विश्रांती मिळणे गरजेचे असल्याचे कोहलीने स्पष्ट केले आहे. जर खेळाडू आयपीएलमध्ये खेळू इच्छित असतील तर त्यांना सुरुवातीचे ८-१० सामने आणि त्यानंतर संघाच्या गरजेनुसार खेळू देण्यात यावे अशी मागणीही विराटने केली आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत आयपीएल खेळणार की नाही हे कळवण्याची मुदत
प्रत्येक खेळाडूला १५ नोव्हेंबरपर्यंत आगामी आयपीएल आपण खेळणार की नाही याबद्दल आपापल्या संघमालकांना कळवायचे आहे. विराट कोहलीला सध्या सुरू असलेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेमधून विश्रांती देण्यात आलेली आहे. आगामी वर्ल्डकप लक्षात घेता बीसीसीआय पुढील मालिकांमध्ये प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार असल्याचेही समोर आले होते.