कोण काय बोलतोय हे ठाऊक आहे! – कार्तिक

कोण काय बोलतोय हे ठाऊक आहे! – कार्तिक

दिनेश कार्तिक

कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीच्या ५ पैकी ४ सामने जिंकल्यानंतर, त्यांना सलग ६ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध ही पराभवाची मालिका मोडली. मात्र, या मधल्या काळात कर्णधार दिनेश कार्तिक आणि संघ व्यवस्थापनावर बरीच टीका झाली होती. या संघाचा भाग असलेल्या आंद्रे रसेलनेही त्यांच्यावर टीका केली होती. मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर माझ्याविषयी कोण काय बोलतोय हे ठाऊक आहे असे विधान कार्तिकने केले.

क्रिकेटमध्ये सामने खेळताना खूप दबाव असतो. त्यातच आयपीएलसारखी मोठी स्पर्धा खेळताना हा दबाव अधिकच वाढतो. त्यामुळे या स्पर्धेत सर्व खेळाडू आपले सर्वोत्तम प्रदर्शन करू शकतील यासाठी तुम्हाला प्रत्येक खेळाडूच्या मानसिकतेची काळजी घ्यावी लागते. जेव्हा संघ कठीण परिस्थित असतो, तेव्हा संघाबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या जातात. त्यातील काही गोष्टी तर संघातील खेळाडूच बोलतात.

मला कोण काय बोलतोय हे ठाऊक आहे आणि मी अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही यासाठी प्रयत्नशील आहे. अखेर हा फक्त एक खेळ आहे. तुम्ही प्रत्येक सामन्यात तुमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे तुम्ही आनंदी राहिले पाहिजे आणि इतरांना चांगली वागणूक दिली पाहिजे. प्रत्येक जणच खूप मेहनत घेत आहे, असे कार्तिक म्हणाला.

First Published on: April 30, 2019 4:09 AM
Exit mobile version