मानवाचा समावेश असलेले भारताचे पहिले अंतराळयान अवघ्या १६ मिनिटांत अंतराळात प्रवेश करणार असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के सीवन यांनी सांगितले आहे. या मोहिमेसाठी तीन भारतीयांची निवड केली जाणार असून या अंतराळयानाला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. तर २०२२ साली गगनयानाचे प्रक्षेपण केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या स्वातंत्र दिनाच्या भाषणात सांगितले होते.
आज दिल्ली येथे भारताच्या पहिल्याच मानवनिर्धारीत मोहिमेबद्दल इस्रोच्या अध्यक्षांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह देखील उपस्थित होते. जितेंग्र सिंह यांनी सांगितले की, “हे यान तीन भारतीयांना घेऊन जाणार आहे, सर्विस मोड्यूलमध्ये हे तीनही लोक असतील. त्यासोबतच परिभ्रमण मोड्यूल असेल जे जीएसएलव्ही एमके ३ रॉकेट या धर्तीवर नव्या तंत्रज्ञानासहित एकत्रित केलेले असेल.”
.@Isro is on the verge of launching first Indian into space : Union Minister @DrJitendraSingh #ISRO #IndiaInSpace pic.twitter.com/5FlALKXIzR
— PIB India (@PIB_India) August 28, 2018
जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, श्रीहरिकोटा येथून जेव्हा हे यान उड्डाण घेईल तेव्हा अवघ्या १६ मिनिटांत पृथ्वीपासून ३०० ते ४०० किमी अंतरापर्यंत म्हणजेच पृथ्वीच्या निम्न कक्षेपर्यंत पोहोचेल. याठिकाणी यानातील लोक पाच ते सात दिवस थांबून सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि इतर वैज्ञानिक प्रयोग करतील.
परतीचा प्रवास ३६ मिनिटांचा
परतीच्या प्रवासात परिभ्रमण मोड्यूल स्वतःमध्ये बदल घडवून आपली दिशा बदलेल. डी-बूस्ट (परतीच्या प्रवासासाठी प्रज्वलन) प्रक्रियेच्या माध्यमातून पृथ्वीच्या १२० किमी अंतरावर सेवा विभाग आणि लोक असलेला विभाग आपोआपच वेगळा होईल. लोक असलेला विभाग पृथ्वीच्या जवळ येताच त्याचा वेग कमी होऊन पॅराशूट उघडले जातील आणि यानातील लोकांना अरबी समुद्राच्या गुजरात नजीक किनाऱ्यावर उतरवले जाईल. हा परतीचा प्रवास तब्बल ३६ मिनिटांचा असेल असेही इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले.