पोलिसांनी वाहन अडवू नये तसेच टोल नाक्यावर टोल वाचवण्यासाठी मंत्रालय प्रतिनिधी असल्याचे बोगस ओळखपत्रे बाळगणाऱ्यासह ओळखपत्रे बनवून देणाऱ्या पोलीस पाटलाला भिवंडी नारपोली पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध शासनाची फसवणूक करून बोगस दस्तऐवज वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर तुळशराम पाटील (४७) व उमेश वसंत तरे(५२) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ज्ञानेश्वर हा जेसीबी ठेकेदार असून उमेश हा कशेळीगाव येथील पोलीस पाटील आहे. कोरोनाच्या अनुषंगाने नारपोली पोलिसांनी माणकोली नाका येथे नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी ज्ञानेश्वर पाटील याचे वाहन तपासणीसाठी अडवण्यात आले. ज्ञानेश्वर याने पोलिसांना ओळखपत्र काढून दाखवले त्या ओळखपत्रावर व्ही.आय.पी.सुरक्षापत्र पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि पोलीस निरीक्षक विषेश शाखा ठाणे अशी राजमुद्रा असलेले स्टॅम्प, हुद्दा मंत्रालय प्रतिनिधी मुख्यमंत्री दौरा असे लिहण्यात आले होते.
नाकाबंदीवरील पोलिसांना संशय येताच त्यांनी ज्ञानेश्वर याला साहेब कुठल्या विभागात काम करतात तुम्ही असे विचारताच ज्ञानेश्वर गोंधळला, त्याला काहीच सांगता येत नसल्याचे बघून पोलिसांचा संशय खरा ठरला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो भिवंडीतील आलिमघर येथे राहणार असून त्याचा जेसीबी भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय असल्याचे त्याने सांगितले. टोल नाक्यावर टोल भरावा लागू नये तसेच पोलिसांनी अडवू नये म्हणून ज्ञानेश्वर याचा साडू कशेळीगावचा पोलीस पाटील उमेश तरे याने सहा महिण्यापुर्वी ४ हजार घेऊन ओळखपत्र बनवून दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. नारपोली पोलिसांनी ज्ञानेश्वर आणि उमेश तरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल दोघांना अटक केली आहे.