मुंब्र्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात; नळाला दूषित पाणी

मुंब्र्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात; नळाला दूषित पाणी

ठाणे: मुंब्रा येथील शंकर मंदिर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, शिवाजी नगर, अमृत नगर या परिसरात दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अवघे दोन तास हा पाणी पुरवठा ठाणे महापालिकेकडून केला जातो.

हे दूषित पाणी प्यायल्यास कावीळ, उलट्या, जुलाब यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरत आहे. मुंब्र्याला पाणीपुरवठा सुरळीत नाही, निदान पिण्याचे पाणी तरी योग्य मिळावे अशी मागणी काँग्रेसचे ठाणे शहर प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत विविध भागात फुटलेल्या जलवाहिन्या, जलवाहिन्यांची दुरुस्ती इ. कामाच्या अनुषंगाने, कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा व नळास अति दूषित पाणी येणार असल्यास ते पिणे टाळावे, औषधांचा वापर करावा व काही दिवस पाणी उकळून व गाळून पिण्यासंबंधी नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. याबाबत योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच पाण्याचा रंग व चव बदलली असल्यास नमुने घेऊन त्याची चाचणी होणे गरजेचे आहे. ही बाब मागील आठवड्यातच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निवेदन पत्राद्वारे ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी निदर्शनास आणून दिली होती.

त्यानंतर देखील महापालिकेकडून मुंब्र्यात दुषित पाणीपुरवठा सुरूच आहे. पाणीपुरवठा दिवसांतून केवळ दोनच तास होत आहे. किमान हे पाणी तरी पालिकेने पिण्यायोग्य पुरवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातून मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाणी जल बोगद्याद्वारे भांडुप येथील जल शुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते. याच जलशुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेणार्‍या भूमिगत जल बोगद्याला ठाणे शहरातील किसन नगर भागात बोअरवेल साठीचे खोदकाम करताना नोव्हेंबर महिन्यात हानी झालेली आहे. मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणी दररोज अंदाजे पाच ते सहा दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. वाया जाणारे पाणी पटकन निदर्शनास येणार नाही अशा पद्धतीने सक्शन पंप द्वारे गटारात व नाल्यात सोडलेले जात असल्याचा आरोप पिंगळे यांनी गेल्या आठवड्यात केला होता.

First Published on: March 26, 2023 5:49 PM
Exit mobile version