ठाणे – समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. शनिवारी (दि. २० एप्रिल) आपल्या आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सादर केला होता. मात्र काही अवघ्या तासांच्यात आत त्यांनी तो राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. पक्षात काही दलाल असून त्यांना ओळखून त्यांची पक्षातून हाकालपट्टी करा अशी मागणी शेख यांनी अबू आसिम आझमी यांच्याकडे केली आहे.
शनिवारी आमदारकीचा राजीनामा देताना रईस शेख यांनी पक्षाकडून पक्ष विस्तारासंदर्भात मांडलेल्या मुद्दयावर कार्यवाही नसल्यचे सांगत राजीनामा दिला होता. शेख यांच्या राजीनाम्यांनंतर भिवंडीत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. त्याचबरोबर शेख यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी देखील लावून धरली. शनिवारी रात्री उशिरा शेख हे भिवंडीत आले त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
त्यावेळी त्यांनी पक्षातील काही नेत्यांवर आरोप देखील केले. त्यावेळी ते म्हणाले भिवंडी ही समाजवादी पक्षाची आहे. मी कधीही पक्ष सोडणार नाही. परंतु पक्षातील दलालांची हाकलपट्टी करावी अशी मागणी आझमी यांच्याकडे केली. पक्षाला दलालांच्या ताब्यात द्यायचे नाही. ही निवडणूक पैशांच्या जोरावर होणार नाही. हे वक्तव्य दलालांना खटकले होते. कारण, भिवंडीत पैशांचे समीकरण झाले नाही तर यांची घरे कशी चालणार? त्यामुळे दलालांच्या पोटात दुखायला लागले. अशा दलालांना अबू आझमी ओळखतात. आझमी हे त्यांना लाथ मारून बाहेर काढतील असेही शेख म्हणाले. मी कार्यकर्ते आणि जनतेच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे मी राजीनामा मागे घेत आहे. भिवंडीला दलालांपासून मुक्त केले जाईल असा दावाही त्यांनी केला.