भाऊबीजेच्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याचं नवं गाणं भेटीस आले आहे. हे गाणं राज्यातील समस्त बंधूना समर्पित केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांच्या या नव्या गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील आहेत. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे. अमृता फडणवीसांच्या या नव्या गाण्याला ३५० लाईक, साडेचार हजार जणांना नापसंती दर्शवली असून आतापर्यंत या गाण्याला ९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
महेश टिळेकर हे नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. तसेच विविध घडामोडींवर ते आपली रोखठोक भूमिका नेहमी मांडून व्यक्त होत असतात. दरम्यान यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या नव्या गाण्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.
असे म्हणाले टिळेकर…
“चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते, लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ”
आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,?त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी. पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ” आज अमृताचा घनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा.” असे म्हणत महेश टिळेकर यांनी फेसबुक पोस्ट लिहून अमृता फडणवीसांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे-
तिला शिकू द्या
जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या
समाज भक्कम करायचा असेल तर
तिला आधी सक्षम होऊ द्या.#दिवाळी च्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत-तिला जगू द्या👉 https://t.co/eOY2BE0O8D #bhaidooj2020 #BhaiDuj pic.twitter.com/17cfvdQE9A— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 16, 2020
दिपावलीच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी त्यांचे नवं गाणं स्त्रियांना समर्पित केलं असून स्त्री शक्तीचे महत्व पटवून दिले आहे. समाज जागृतीच्या दृष्टीने त्यांनी हे त्यांचे नवं गाणं समोर आणलं असलं तरी नेटकऱ्यांनी त्यांच्या आवाजावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे.