मालेगावला कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सोशल मीडियावर कोरोनाविषयी गैरसमजही मोठ्या प्रमाणात पसरवण्यात येत होते. एकीकडे नागरिकांचे खलावणारे आरोग्य आणि दुसरीकडे कायदा व सुव्यवस्थेवर वाढणारा ताण यामुळे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान होते. पण मुस्लिम धर्मगुरू आणि समाजातील प्रतिष्ठितांना बरोबर घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. ईदच्या सणाला सामुदायिक नमाज पठण झाल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडेल आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो ही बाब लक्षात घेत विशेष नियोजन करण्यात आले. काय होते हे नियोजन याविषयीची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी ‘माय महानगर’च्या विशेष मुलाखतीत दिली.