आठवलेंच्या आरपीआयला हव्यात १० जागा

आठवलेंच्या आरपीआयला हव्यात १० जागा

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामध्ये जागांवरून विविध तर्क वितर्क लढवले जात असताना आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील शिवसेना-भाजपाने आम्हाला १० जागा द्याव्यात अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजपा-शिवसेनेकडे मित्र पक्षांना किती आणि कोणत्या जागा सोडाव्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरपीआयकडून २३ जागांची यादी चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यापैकी १० जागा देण्यात याव्यात अशी मागणी केल्याचे रामदास आठवले यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

तर महायुती २४० जागा जिंकेल 

दरम्यान यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “जर युतीत असलेले घटक पक्ष एकत्र आले तर २४० पर्यंत जागा मिळतील. त्यामुळे शिवसेना भाजपाने मित्रपक्षांनाही जागा सोडाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सध्या राजे, महाराजे भाजपामध्ये येऊ लागले आहेत. त्या सर्वांनाच तुम्ही घेऊ नका. तर त्यातील काही आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांना निवडून आणू, असे देखील आठवले म्हणाले.

हेही वाचा – लवकरच मुंबईत माझा भाजपप्रवेश होईल – नारायण राणे

काश्मीरबाबतचा सरकारचा निर्णय लोकांच्या पसंतीस

दरम्यान यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. याआधी शिवसेना-भाजपा या पक्षात कुणी रहायला तयार नव्हते. पण आता उलट झाले आहे. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये राहायला कोणी तयार नाही, अशी टीका देखील त्यांनी केली. दरम्यान यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नावरून काँग्रेसवर टीका करत काँग्रेसने काश्मीर संदर्भात विश्वासघात केल्याचे सांगत आमच्या सरकारने घेतलेला निर्णय लोकांना आवडल्याचे ते म्हणाले.

युती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेन 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे रामदास आठवले यांना शिवसेना-भाजपा युती बाबत विविध चर्चा सुरू असताना युती टिकेल असे वाटते का? असे विचारले असता त्यांनी युती टिकवून ठेवण्याचा मी प्रयत्न करेन असे सांगितले.

First Published on: September 17, 2019 7:40 PM
Exit mobile version