सध्या राज्यात सत्ता शिवसेनेची येणार की भाजपची? मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा? याचीच सगळ्यात जास्त चर्चा असताना आता राजकारणात शेवटच्या क्षणी आणखी एक ट्विस्ट आला आहे. हा ट्विस्ट वाढला आहे तो शिवसेना आमदारांमुळे. शिवसेना आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेने पुरेपूर काळजी घेतली असून, या सर्व आमदाराना रंगशारदा येथे ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही, तर रंगशारदा येथे कडक सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आली आहे.
या नेत्यांवर खास जबाबदारी!
दरम्यान, रंगशारदा येथे शिवसेनेने २५ खोल्या बुक केल्या असून, एका खोलीमध्ये दोन आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर या सर्व आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी काही शाखा प्रमुख देखील नेमण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे हे सर्व आमदार युवा सेना नेते सूरज चव्हाण, शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे, अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नजर कैदेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आमदार रंग शारदामध्ये असले, तरी त्यांच्यावर कडक पाळत ठेवण्यासाठी एका आमदार, एक विभागप्रमुख, दोन शाखा प्रमुख आणि ३ शिवसैनिक नेमण्यात आले आहेत.
हेही वाचा – मला युती तोडायची नाही, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच-उद्धव ठाकरे
म्हणून रंगशारदाची निवड!
रंगशारदा आणि मातोश्री हे वांद्रेमध्ये येत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील या आमदारांशी बोलून काही निर्णय घ्यायचा असल्यास ते सोयीस्कर होणार आहे. तसेच शिवसेनेच्या गोटात अनेक हालचाली सुरू असून, कधीही कोणताही निर्णय होऊ शकतो. तसेच शिवसेना सत्तेची गणितं जुळवून सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकते. ही सर्व गणिते बघता ग्रामीण भागातील आमदारांना रंगशारदावर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, काही मुंबईतील आमदारांनी आम्ही आपापल्या घरी राहतो असे सांगितले, मात्र त्यांना देखील रंगशारदामध्ये थांबण्यास सागितले आहे.