कल्याण डोंबिवलीप्रमाणेच, अंबरनाथ-बदलापूर नवी महापालिका ?

कल्याण डोंबिवलीप्रमाणेच, अंबरनाथ-बदलापूर नवी महापालिका ?

कल्याण डोंबिवलीप्रमाणेच, अंबरनाथ-बदलापूर नवी महापालिका ?

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदांची मुदत येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार आहे. मात्र अंबरनाथ बदलापूर नवी महापालिकेच्या हालचालींना वेग आल्यामुळे जिल्हयात आणखी एक महापालिका उदयास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली शहराप्रमाणेच अंबरनाथ बदलापूर या दोन्ही शहरांची एकत्रीत महापालिका करावी अशा हालचाली गेल्या पाच वर्षापासूनच सुरू आहेत.

१ ऑक्टोबर १९८३ साली कल्याण महापालिका अस्तित्वात आली. त्यावेळी उल्हासनगर वगळून, अंबरनाथ- बदलापूरचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर १९९२ ला विभाजन होऊन अंबरनाथ बदलापूर समवेत २० खेडी वगळण्यात आली होती. आता अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपरिषदांचा स्वतंत्र कारभार सुरू आहे. अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे लागून असल्याने त्यांच्या एकत्रीत महापालिकेचा विषय गेल्या पाच वर्षापासून चर्चेत आहेत. अंबरनाथ नगरपालिका आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यासाठी जानेवारी महिन्यात निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याने अंबरनाथ बदलापूर महापालिकेच्या चर्चेला पुन्हा सुरूवात झाली. पाच वर्षापूर्वी कोकण आयुक्तांनी पालिकांची पाहणी करून तसा अहवालही सादर केला होता.

महाविकास आघाडीमुळे महापालिकेच्या मागणीला जोर 

अ्ंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांची लोकसंख्या आणि भौगोलिक रचना लक्षात घेता त्या दृष्टीने राज्य शासनाकडूनही अनुकूलता आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मागील पाच वर्षे भाजप प्रणित सरकार असल्याने एकत्रीत महापालिकेचा विचार गुंडाळण्यात आला होता. आता राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीेचे सरकार स्थानापन्न झाले आहे त्यामुळे एकत्रीत महापालिकेच्या मागणीला आणखीनच जोर वाढला आहे.

First Published on: February 7, 2020 9:15 PM
Exit mobile version