थरारक अनुभव: १० तास ढिगाऱ्याखाली अडकून ‘त्याने’ मृत्यू डोळ्याने पाहिला

थरारक अनुभव: १० तास ढिगाऱ्याखाली अडकून ‘त्याने’ मृत्यू डोळ्याने पाहिला

भिवंडी इमारत दुर्घटनेतून तब्बल १० तासानंतर तो जिवंत बाहेर आला

भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा बळी गेला आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता बचाव कार्याचे काम थांबवण्यात आले. या दुर्घटनेत दिड ते पंधरा वर्ष वयोगटातील एकूण २० चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला. याच ढिगाऱ्याखाली १० तास अडकून पडलेल्या एका व्यक्तीने मृत्यू डोळ्यासमोर पाहिला. मृत्यूशी झुंज देत असताना जगण्या-मरण्याची थराराची कथा त्याने प्रसारमाध्यांसमोर मांडली. विशेष म्हणजे ढिगाऱ्याखाली सुमारे १० तास अडकून पडलेल्या या व्यक्तीकडे केवळ एक लिटर पाण्याची बाटली आणि मोबाईल जवळ होता. त्याला वाटलं की, आपण आता वाचू शकत नाही. यामुळे त्याने ढिगाऱ्याखालीच मोबाईलवर दुर्घटनेत घडलेला थरार कथन करणारा व्हिडिओ तयार केला.

ढिगाऱ्याखाली १० तास अडकलेल्या या व्यक्तिचे नाव खालिद खान असून तो दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटूंबासह राहत होता. ढिगाऱ्याखाली अडकलेला असताना त्याने अनेकांशी मोबाइलवरून संपर्क केला होता. मात्र नेटवर्क मिळत नव्हते. अशातच त्याचे नशीब बलवत्तर म्हणून बचाव पथकाने त्याचा आवाज ऐकून त्याला १० तासानंतर ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यामुळे या घटनेचा थरार समोर आला. “उघड्या डोळ्याने मी मृत्यू पहिला. पण खुदाने माझ्यासाठी बंदे पाठवून मला वाचवले.”

खालिदचा भाऊ याच दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होता. या इमारतीमध्ये त्यांचे तीन फ्लॅट होते. दुर्घटनेतून बचावलेला खालिद खान याचे भिवंडीतील धामणकर नाका परिसरात मोबाईल विक्रीचे दुकान आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने व्यवसाय बंद होता. त्यामुळे त्याने पत्नी आणि मुलांना मूळ गावी पाठवून दिल्याने खालिद घरात एकटाच होता. तर तिसऱ्या मजल्यावर आई, वडील व बहीण राहत होती. त्यांनाही बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या खालिदच्या भावाचे संपुर्ण कुटूंब या दुर्घटनेत बळी गेल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान उपचार करून आल्यानंतर त्याने एनडीआरएफ आणि टीडीआरएफ पथकाचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत काही काळ ढिगारा उपसण्याचे कामही केले. माझ्यासाठी बचाव पथक देवासारखे धावून आल्याची प्रतिक्रियाही खालिदने दिली. या दुर्घटनेत १९ रहिवाशी जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. तर बचावकार्य गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता थांबवण्यात येऊन मृतांचा आकडा ३८ असल्याचे पालिका आणि पोलीस प्रशासनाने जाहिर केले आहे.

First Published on: September 24, 2020 7:35 PM
Exit mobile version