पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी CID कडून आणखी २४ जणांना अटक

पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी CID कडून आणखी २४ जणांना अटक

प्रातिनिधीक फोटो

महाराष्ट्र सीआयडी शाखेकडून आज गुरूवारी पालघर हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक केले आहे. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या गडचिंचले साधू हत्याकांडामध्ये सहभाग असल्याच्या आरोपातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मॉब लिंचिंगमध्ये तीन साधुंची अमानुष हत्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणाअंतर्गत जवळपास १७८ जणांना ताब्यात घेतले आहे.

१ मे रोजी महाराष्ट्राच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजेच सीआयडी शाखेकडून पालघर हत्याकांड प्रकरणात पाच जणांना अटक केली होती. जेव्हापासून या घटनेच्या तपासानं आणखी वेग पकडला होता.

असे आहे प्रकरण

पालघरमधील गडचिंचले गावात दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला. जमावाने त्यांची कारही पलटी केली.

गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तीनही जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेकडोंच्या जमावासमोर चार पोलिसांचे काहीच चालले नाही. जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. मात्र जमावाने त्या तीन जणांची दगडाने ठेचून, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. हे प्रकरण चिघळल्यावर आरोपी जंगलात लपून बसले होते.


शहापूरमध्ये वीज कोसळल्याने २६ जण गंभीर जखमी; उपचार सुरु

First Published on: October 22, 2020 11:34 AM
Exit mobile version