नव्याने उभ्या राहत असलेल्या शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूला माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांचे नाव देण्याची मागणी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. अंतुले यांनी रायगड जिल्ह्यात अनेक मोठमोठे प्रकल्प आणून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली, याची आठवण घरत यांनी सरकारला करून दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचे नाव दिले. मुख्यमंत्री असताना अनेक धाडसी निर्णय घेऊन रायगडचा कॅलिफोर्निया बनविण्यासाठी त्यांनी जीवापाड प्रयत्न केले. मात्र अल्पकाळातच त्यांना पदावरून दूर व्हावे लागले. केंद्रीय मंत्री असताना जिल्ह्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. त्याचा फायदा जिल्ह्याबरोबर देशातील जनतेलाही झाल्याचे घरत यांनी आपल्या मागणी पत्रात नमूद केले आहे.
अंतुले यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा, यासाठी त्यांचे नाव न्हावाशेवा-शिवडी पुलाला देण्यात यावे, अशी मागणी घरत यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही अवगत करून देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या या मागणीचे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आणि जिल्हा पदाधिकार्यांनी स्वागत केले आहे.
हे ही वाचा – ईडीची पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर?, चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा