पालघर जिल्ह्यात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम; ४२ वीज चोरांवर कारवाई

पालघर जिल्ह्यात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम; ४२ वीज चोरांवर कारवाई

पालघर जिल्ह्यात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम

पालघर जिल्ह्यात वीज चोरट्यांविरुद्ध सुरु केलेल्या व्यापक मोहोमेच्या सुरूवातीस ४२ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. या चोरट्यांकडून जवळपास दीड लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. वीजचोरीच्या देयकाचा भरणा करण्याच्या नोटीसा संबंधितांना बजावण्यात आल्या आहेत. वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ व १२६ नुसार वीजचोरी हा तीन वर्षांचा कारावास व दंडाच्या शिक्षेस पात्र गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे रीतसर वीजजोडणी घेऊन विजेचा अधिकृत वापर करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

वीजचोरीला प्रतिबंध कारण्यासाठी पालघर जिल्ह्यात १० डिसेंबरपासून व्यापक व धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पालघरसह बोईसर, डहाणू, सफाळे, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आदी भागातील वीज जोडण्यांची तपासणी करण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २८२ वीज जोडण्याची तपासणी करण्यात आली. यात ३९ ठिकाणी थेट वीजचोरी तर ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. एकूण ४२ जणांकडून दीड लाख रुपयांच्या १५ हजार २०० युनिट विजेचा चोरटा वापर झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, वीजचोरीची बिले भरण्याबाबत संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या असून हे बिल अदा न झाल्यास फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमेत वीज मीटर मध्ये छेडछाड अचूकपणे शोधण्यासाठी ‘ऍक्यूचेक’च्या मदतीने जागेवरच मीटर तपासणी करण्यात येत आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, अधिकारी व जनमित्र या मोहिमेत सहभागी आहेत.


दुसरा घरोबा! आई-चिमुकल्यांचा रहस्यमय गळफास
First Published on: December 11, 2020 4:55 PM
Exit mobile version